पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
सशक्त लोकायुक्त विधेयकाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य शासनाला उपोषणाचा इशारा दिला आहे. या मागणीसाठी 30 जानेवारी 2026 पासून राळेगणसिद्धी गावातील यादवबाबा मंदिरात उपोषणाला बसणार आहेत. या संदर्भात आण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून इशारा दिला आहे.
याचा मागणीसाठी अण्णांनी 30 जानेवारी 2019 मध्ये सात दिवस यादवबाबा मंदिरात उपोषण केले होते. त्यानंतर आता सहा वर्षांनी ते उपोषणाला बसणार आहेत. या पत्रामध्ये हजारे म्हटले की, राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा करावा यासाठी 23 मार्च 2018 रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर सात दिवसांचे उपोषण करण्यात आले आणि त्यानंतर 30 जानेवारी 2019 रोजी राळेगणसिद्धीच्या यादबबाबा मंदिरात सात दिवसांचे उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर कायदा करण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली शासनाचे पाच सदस्य आणि सिव्हिल सोसायटीचे पाच सदस्य अशी संयुक्त मसुदा समिती स्थापन करून सदर समित्याच्या 9 बैठका घेऊन लोकायुक्त कायद्याचा मुसदा तयार केला.
दरम्यान, 28 डिसेंबर 2022 रोजी राज्याच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक विधानसभेमध्ये मंजूर करण्यात आले. त्यानंतर 15 डिसेंबर 2023 रोजी राज्याच्या विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आले. 20 डिसेंबर 2024 रोजीच्या आपल्या पत्रात लोकायुक्त विधेयकास राज्यपाल महोदयांनी मान्यता दिली आहे आणि हे विधेयक राष्ट्रपती महोदयांच्या मंजूरीसाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले असून त्यासाठी आवश्यक पाठपुरावा शासन करत आहे असे पत्रात नमुद केले आहे. परंतु आपण पाठविलेल्या पत्राला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी आणि कायदा विधान परिषदेमध्ये मंजूर होऊन दोन वर्षाचा कालावधी झाला आहे.
मात्र अद्यापही राज्यात सशक्त लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही. हा काही माझा वैयक्तिक प्रश्न नाही. देशातील जनतेचा प्रश्न आहे. देशातील भ्रष्टाचाराला रोखण्याचा प्रश्न आहे. एवढा प्रदीर्घ काळ झाल्यानंतरही लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी होत नाही, यावरून हे स्पष्ट होते की, राज्यात लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्याची सरकारची इच्छा दिसत नाही. त्यामुळे मी विचार केला की, हार्ट अटॅकने मृत्यू येण्यापेक्षा देश आणि समाजाच्या हितासाठी मृत्यू आला तर ते माझे भाग्य समजेन. म्हणून आपणास स्मरण करून देत आहे की, आपल्या सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी झाली नाही तर महात्मा गांधीजींच्या अहिंसात्मक मार्गाने मी राळेगणसिद्धी येथील संत यादवबाबा मंदिरामध्ये दि. 30 जानेवारी 2026 पासून पुन्हा माझे आमरण उपोषण सुरू करीत आहे, असा इशारा अण्णा हजारे यांनी या पत्राच्या माध्यमातून दिला आहे.





