अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यात लम्पी स्किन रोगाचा विळखा दिवसंदिवस आणखी घट्ट होतांना दिसत आहे. आतापर्यंत लम्पीची लागण झालेल्या जनावरांची संख्या 116 वर पोहचली असून 138 गावात पाच किलो मीटर भागाचे लसीकरण पशूसंवर्धन विभागाला करावे लागणार आहे.
दरम्यान, रविवार असतांना देखील मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी आणि पशूसंवर्धन विभागातील अधिकार्यांची व्हीसीव्दारे बैठक घेवून लम्पीने बाधित असणारी गावे आणि त्याच्या परिघात असणार्या 138 गावातील जनावरांच्या गोठा आणि परिसारात फॉगींग करण्याच्या सुचना दिल्या आहेत. डास आणि माशांमार्फत लम्पीचा प्रसार होवू नयेत, यासाठी तातडीने उपाययोजना करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी सांगितले आहे.
दरम्यान, दररोज लम्पी रोगांचा जनावरांमध्ये फैलाव वाढतांना दिसत असून सुरूवातीला या रोगामुळे जनावरे दगावणार नाही, असा दावा करणार्या पशूसंवर्धन विभागाचा अंदाज चुकला असून राहाता, राहुरी आणि पाथर्डीत तिन जनावरे या रोेगाने मरण पावले आहेत. दुसरीकडे जिल्ह्यात 138 गावात 1 लाख 68 हजार 371 जनावरांचे लम्पीचे लसीकरण करण्यात येणार असून आतापर्यंत 1 लाख 9 हजार 200 लसींचे तालुकानिहाय वाटप करण्यात आले असून गाव पातळीवर 66 हजार 372 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी संजय कुमकर यांनी दिली.