पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
भरमसाठ परतावा देण्याच्या अमिषाला बळी पडल्याने सुपा परिसरातील अनेकांचे सुमारे चारशे कोटी रुपये बुडाल्यात जमा आहेत. कारण सुपा येथील सिस्पे कंपनीने गाशा गुंडाळला असून सुमारे चार महिन्यांपासून फक्त लवकरच तुमचे पैसे मिळतील, काळजी करू नका अशा भूलथापा दिल्या जात आहेत. याविरोधात ठेवीदार आक्रमक झाले असून उद्या (दि.18) संबंधित एजंटांना जाब विचारणार आहेत. यानंतर सुपा पोलिस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती ठेवीदारांनी दिली. बुधवारी सर्व ठेवीदार एकत्र येऊन सुपा येथील इन्फोटेक बिकन या शाखेत गेले असता, ही शाखा 15 दिवसांपासून बंद असल्याचे ठेवीदारांना दिसले.
दरम्यान, आम्ही आहोत अशी आश्वासने देण्याचे काम येथील कंपनीच्या एजंटांनी केले आहे. गुंतवणूकदार पैसे मागण्यासाठी चकरा मारत आहेत. मात्र, आता पंधरा दिवसांपासून कार्यालयच बंद झाल्याने अनेक जण याबाबत तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत. पारनेर तालुक्यात यापूर्वी काही पतसंस्थांमध्ये घोटाळे झाल्याने त्या पतसंस्थांमध्ये अनेक गोरगरीब ठेवीदारांचे लाखो रुपये अडकले आहेत. त्यानंतरही पारनेर शहरात मश्रीमंत बाजारफ नावाने एक ऑनलाइन ट्रेडिंग सुरू झाले. त्यातही सुमारे 15 ते 20 टक्के परतावा दिला जात होता. या मोठ्या परताव्याच्या अमिषाला बळी पडून त्यातही अनेक उच्चभ्रू व सुशिक्षितांनी कोट्यावधीची गुंतवणूक केली होती. मात्र, त्याही कंपनीचे काही दिवसातच दिवाळे निघाले आणि त्यातही गुंतवणूकदारांचे लाखो रुपये अडकले, ते परत मिळालेच नाहीत.
त्यानंतर सुपे येथील मनिमॅक्स नावाची कंपनी आली. या कंपनीने 12 ते 18 टक्के परताव्याचे अमिष दाखविले आणि काही दिवस परतावाही दिला. मात्र, सुमारे सहा महिन्यांपूर्वी ही कंपनीसुद्धा गायब झाली. यामध्ये सुपा व परीसरातील लाखो रुपये गुंतवणूकदारांचे बुडाले आहेत. या कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे. याला काही महिने होत नाहीत तोच आता सुपा व परीसरातील गुंतवणूकदारांचे प्रथम सिस्पे आणि नंतर झेस्ट या नावाच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली 10 ते 12 टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवून लाखो रुपये जमा केले.
आता याही ठिकाणी गुंतवणूकदारांचे काही दिवसांपासून पैसे परत मिळेनासे झाले आहेत. कंपनीचे काम सुरू आहे, कंपनीचे नाव बदलले आहे, परकीय चलनात आपले शेअर्स बदलले जात आहेत, सॉफ्टवेअर दुरुस्ती सुरू आहे, अशी कारणे सांगत गुंतवणूकदारांना काही दिवस झुलवत ठेवले होते. आता मात्र कंपनीचे कार्यालय गेली पंधरा दिवसांपासून बंद झाल्याने गुंतवणूकदारांना आता पैसे मिळणार नाहीत अशी खात्री झाली आहे. त्यामुळे काही गुंतवणूकदार एकत्र येऊन तक्रार देण्याच्या तयारीत आहेत.
सिस्पेमध्ये पैसे जमा करण्याचे प्रलोभन देणारे गावातील स्थानिक एजंट होते. त्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी विश्वास ठेवला. एजंटांनी आपले मित्र आणि जवळचे नातेवाईक यांचेच पैसे गुंतवणुकीसाठी घेतले. त्यांना प्रथम काही दिवस चांगला परतावा दिला होता. आता मात्र पैसे मिळत नसल्याने सर्वजण हताश झाले आहेत. पैसे मित्राच्या किंवा नातेवाईकांच्या माध्यमातून गुंतवल्याने अनेकांची तक्रार करण्याची अडचण झाली आहे.
जमीन अन् पैसेही गेले
अनेकांनी कर्ज काढून तर काहींनी आपली सेवानिवृत्तीची पुंजी यात गुंतविल्याची चर्चा सुरू आहे. सुपा परीसरात नव्याने एमआयडीसी झाल्याने त्या ठिकाणी ज्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्यांना जमिनीचे पैसे मिळाले होते. त्यांनी ते पैसे यात गुंतविले आहेत. त्यामुळे आता जमीनही गेली व पैसेही गेले अशी काहींची अवस्था झाली आहे. याच कंपनीच्या नावांने पारनेरसह श्रीगोंदे, अहिल्यानगर व पुणे जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर गुंतवणुक झाली आहे. व ती सुमारे तीन हजार तीनशे कोटी रूपये असल्याचे समजते. याविरोधात ठेवीदार आक्रमक झाले असून याचा उद्रेक बुधवारी (दि.16) शाखेसमोर पहावयास मिळाला.




