मुंबई | Mumbai
भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे आमदार रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी (BJP State President) कुणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. त्यानंतर अखेर आज (मंगळवारी) भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी वरळीत पक्षाचा मेळावा पार पडला. यावेळी निरीक्षक किरण रिजिजू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी घट्ट जोडलेला आहे. तसेच त्यांचा भूतकाळ बजरंग दलाशी जोडलेला आहे.
डोंबिवलीसारख्या (Dombivli) संघाच्या प्रभावाखालील भागातून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली आणि संघाच्या शिस्त, कार्यपद्धतीचा प्रभाव त्यांच्या नेतृत्वशैलीत स्पष्टपणे दिसून येतो. संघटनात्मक बांधणी, सदस्य नोंदणी आणि पक्षविस्ताराच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी संघाच्या मार्गदर्शनाखाली भूमिका बजावली आहे. पक्षाच्या विविध मोहिमांमध्ये आणि सदस्य नोंदणी अभियानात त्यांना राज्यस्तरीय जबाबदार्या देण्यात आल्या, यामागे त्यांची संघाशी असलेली नाळ आणि निष्ठा हे मुख्य कारण मानले जाते.
रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
रविंद्र चव्हाण यांचा जन्म २० सप्टेंबर १९७० साली झाला. यानंतर त्यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण घेतले. २००२ साली भाजप युवा मोर्चाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर २००५ मध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि २००७ मध्ये स्थायी समितीचे सभापती झाले. यानंतर तत्कालीन भाजप आमदार हरिश्चंद्र पाटील यांचे तिकीट कापून रविंद्र चव्हाण यांना पक्षाने २००९ मध्ये उमेदवारी दिली आणि ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले.
यानंतर २०१४ मध्ये ते दुसर्यांदा आमदार (MLA) झाले. यावेळी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली. तसेच रायगड आणि पालघर जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाची जबाबदारी देखील त्यांना मिळाली होती. तर २०१९ मध्ये ते तिसऱ्यांदा आमदार झाले. त्यांचा २०२१ मध्ये शिंदे भाजप सरकार आणण्यात मोलाचा वाटा होता. त्यामुळे रवींद्र चव्हाणांची २०२१ मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते आणि सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर २०२४ मध्ये चौथ्यांदा डोंबिवलीतून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. त्यानंतर आता त्यांना महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली आहे.





