Thursday, July 4, 2024
Homeब्रेकिंग न्यूजअर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी…; उध्दव ठाकरेंचा अर्थसंकल्पावरुन सरकारवर हल्लाबोल

अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी…; उध्दव ठाकरेंचा अर्थसंकल्पावरुन सरकारवर हल्लाबोल

मुंबई | Mumbai
निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात. आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी होती. थापांचा महापूर आहे आणि सगळ्याच घटकांना आपल्यासोबत जोडण्याचा प्रयत्न म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या भाषेत खोटे नरेटिव्ह असेच अर्थसंकल्पाचे वर्णन करावे लागेल अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर केली आहे.

- Advertisement -

‘गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मागची १० वर्ष भाजपच्या आश्वासनांना आणि थापांना कंटाळून महाराष्ट्राने त्यांना जो काही दणका दिला, त्यानंतर यांचे डोळे थोडेसे किलकिले झालेसे वाटत आहेत. तरीदेखील जनता यांच्या थापांवर विश्वास ठेवेल असं वाटत नाही. महाराष्ट्राची जनता सुजाण, सज्ञान आणि स्वाभीमानी आहे. यांनी कितीही प्रयत्न केला तरी महाराष्ट्राचं ओरबाडून गुजरातला न्यायचं षडयंत्र उघड झालं आहे. महाराष्ट्र गुजरातच्या मागे गेला आहे’ , अशीही टीका उद्धव ठाकरेंनी या अर्थसंकल्पावर केली आहे.

हे ही वाचा: Maharashtra Budget 2024: राज्याच्या अर्थसंकल्पात कुणासाठी काय मिळालं?; वाचा संपुर्ण बजेट A टू Z

ते पुढे म्हणाले की, वारकऱ्यांना विकत घेण्याची परंपरा अर्थसंकल्पातून होतेय का, हा वारकऱ्यांचा अपमान आहे. देहभान विसरून विठुरायाच्या गजरात ते दिंडीत जात असतात. त्यांना पैशाची काही देणे घेणे नसते. मंदिराचा कळस बघून वारकरी दर्शन घेतात. त्यांना तुम्ही पैशाचा लोभ दाखवू शकत नाही.

त्याशिवाय मौलाना आझाद महामंडळाचा निधी वाढवलाय, त्यामुळे आता सरकारने निवडणुका बघून हिंदुत्व सोडले का याचेही उत्तर सरकारने द्यावे. विधानसभा निवडणुका कधी होतायेत याची जनता वाट बघतेय. अर्थसंकल्पात सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. निवडणूक झाल्यानंतर हा सगळा जुमला होता असं बोलतील. हा अर्थसंकल्प आहे की जुमला संकल्प, या जुमलेबाजीला जनता फसणार नाही. महाराष्ट्र लुटणाऱ्यांना जनता पुन्हा सत्तेत आणणार नाही, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी सरकारवर केला आहे.

‘धुळफेक करायची, जनतेला फसवायचं, रेटून खोटं बोलायचं आणि पुन्हा सरकार आणून महाराष्ट्र लुबाडायला सुरूवात करायची. निवडणूक आल्यानंतर अशा काही घोषणा केल्या जातात. आजचा अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी, थापांचा महापूर आहे. सगळ्याच घटकांना सोबत न्यायचा खोटा प्रयत्न आहे, देवेंद्रजींच्या भाषेत खोटे नरेटिव्ह असं वर्णन करावे लागेल’, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

‘रोजगारवाढी साठी कोणतीही उपाय योजना नाही. शेतकऱ्यांना वीजबील माफ करा अशी आमची मागणी मान्य केली, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा ही मागणी मान्य केली नाही. वीजबील माफ केल्यानंतर थकबाकीसह माफ करणार आहात का?’, असेही उद्धव ठाकरेंनी विचारले आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पातील योजनांसाठी आर्थिक तरतूद कशी करणार हा प्रश्न आहे. आजपर्यंत त्यांनी ज्या घोषणा केल्या त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या त्याबद्दल तज्ज्ञांची समिती नेमून त्याची श्वेतपत्रिका काढावी. अनेक घोषणा झाल्या परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. या अर्थसंकल्पाचं वैशिष्टे म्हणजे महिलांना मतदानात आपल्या बाजूला वळवण्याचा केविळवाणा प्रयत्न आहे. मुलगा आणि मुलगी भेदभाव करू नका याबद्दल कुठेही वाच्यता नाही. माताभगिनींना जे देताय जरूर द्या, हजारो तरूण बेरोजगार आहेत. रोजगारवाढीसाठी कुठेही उपाययोजना नाही असेही ठाकरेंनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या