मुंबई | Mumbai
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला महायुती सरकाचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet expansion) अखेर आज (रविवारी) पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे,तर काही श्रेष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे १९, शिवसेनेचे ११ आणि राष्ट्रवादीचे ९ असे एकूण ३९ मंत्री शपथ घेणार आहेत.आज सकाळपासूनच महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून आमदारांना फोन करून मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी तयार राहण्यास सांगण्यात येत आहे.
अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्त्वाखालील महायुती सरकारमध्ये पहिल्यांदाच भाऊ-बहिण एकत्र मंत्रिमंडळात दिसणार आहेत. भाजपकडून विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना सकाळीच मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आला होता. मात्र, त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला नव्हता. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र,अखेर धनंजय मुंडे यांना देखील मंत्रिपदासाठी फोन आला आहे.ही वेळापूर्वीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे हे दुपारी चार वाजता मंत्रिपदाची शपथ घेणार असून बीड जिल्ह्याला एकाच वेळी भाऊ-बहिण असे दोन मंत्री मिळणार आहेत.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची नावे समोर येत असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. यामध्ये धनंजय मुंडे यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांच्यावर पण गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्यातच काल छत्रपती संभाजीराजे यांनी मस्साजोगमध्ये येथे भेट देत याप्रकरणात आरोपींची अटक होईपर्यंत आणि चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याची आग्रही मागणी अजित पवारांकडे करण्यात आली होती. मात्र, अखेर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना मंत्रिपदासाठी फोन आला आहे.