मुंबई | Mumbai
विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) निकालानंतर तब्बल १३ दिवसांनी आज महायुती सरकारचा आझाद मैदानावर ‘महा’शपथविधी पार पडला. या शपथविधी सोहळ्यास उद्योजक, राजकीय, मनोरंजन या क्षेत्रासह आदी क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. तसेच भाजपशासित राज्याचे २२ मुख्यमंत्री देखील या सोहळ्याला हजर होते.
यावेळी सुरुवातीला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. तर शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी पहिल्या रांगेत अंबानी कुटुंबीय देवेंद्र फडणवीस यांचे कुटुंबीय पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, अंबादास दानवे निलम गोऱ्हे, नारायण राणे, उदयनराजे भोसले, राम नाईक यांच्यासह आदींच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर दुसऱ्या रांगेत मर्चंट कुटुंबीय, कुमार बिर्ला, अजय पिरामल, उदय कोटक, शाहरुख खान, संजय दत्त, सलमान खान, सचिन तेंडुलकर, अंजली तेंडुलकर, दिलीप संघवी, अनिल अंबानी, रणबीर कपूर, रणवीर सिंह, गीतांजली किर्लोस्कर, बिरेंद्र सराफ, अनिल काकोडकर यांच्यासह आदींची व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ (Chief Minister’s Oath) घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आईचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांना त्यांच्या आईने औक्षण करून टिळक लावला अन् आशीर्वाद दिले. तर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे लगेच पदभार स्वीकारणार आहेत. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर दालनात येतील. या दालनात त्यांच्या स्वागतासाठी फुलांची देखील सजावट करण्यात आली आहे.