पुणे (प्रतिनिधी)
उत्तरेकडील तीव्र थंड वाऱ्यांचा झंझावाती वेगाने महाराष्ट्रात प्रवेश झाल्याने त्याचा परिणाम राज्यातील तापमानावर झाला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीचा कडाका अधिक वाढला असून, अनेक ठिकाणी रात्रीचा पारा नेहमीच्या सरासरीपेक्षा ४ ते ६ अंशांनी कमी नोंदला जात आहे. दरम्यान, उत्तर भारतात तयार झालेली थंड वाऱ्यांची लाट वेगाने दक्षिणेकडे सरकत असल्यामुळे पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील गारठ्यात आणखी वाढ होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, सोलापूर आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी थंडीची लाट होती. जेऊर येथे काल राज्यातील सर्वात कमी ५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अहिल्यानगरने सलग तिसऱ्या दिवशीही राज्यातील सर्वात थंड जिल्हा म्हणून नोंद कायम ठेवली आहे, जिथे किमान तापमान ६.६ अंश सेल्सिअस इतके होते.
अहिल्यानगर आणि धुळ्याच्या काही भागांत तापमान ४ अंशांपर्यंत घसरण झाल्याची नोंद आहे. धुळे आणि निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ६.१ अंश सेल्सिअसची नोंद झाली. जळगाव येथे ६.९ अंश तर परभणीचे तापमान ५.५ अंशांवर नोंदवले गेले आहे. नाशिक, सातारा, गोंदिया, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत किमान तापमान १० अंशांच्याही खाली होते.
राज्यात वाढलेल्या थंडीमुळे हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भासह तेलंगणा व छत्तीसगड परिसरांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जाहीर केला आहे. याशिवाय जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर, नागपूर आणि गोंदिया यासह अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्टफजारी करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी, नांदेड आणि लातूर तसेच विदर्भातील गोंदिया व नागपूर जिल्ह्यांमध्ये तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ला निनो या हवामान प्रक्रियेच्या प्रभावामुळे डिसेंबर आणि जानेवारी हे दोन्ही महिने राज्यासाठी सर्वाधिक थंड ठरण्याची शक्यता आहे.





