तौक्ते चक्रीवादळाचा फटका आज मुंबई शहराला चांगलाच बसला. दिवसभर पावसाची संततधार आणि सोसाट्याचा वारा यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून काही ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. वाऱ्याचा वेग काही ठिकाणी कमाल ताशी १२० किमी पर्यंत पोहोचला आहे.
हवामान विभागाने (IMD) नवा इशारा देत मुंबईत अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. परंतु मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.
गुजरातच्या गुजरातच्या पोरबंदर आणि महुवा (भावनगर जिल्हा) सागरी किनारपट्टीवर आज रात्री ८.०० – ११.०० वाजल्या दरम्यान हे वादळ धडक देऊ शकते. यावेळी १५५ ते १६५ किलोमीटर प्रती तास वेगाने वारे वाहू शकतात.
मुख्यमंत्र्यांकडून आढावा
तोक्ते” चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व पुनर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील 12 हजार 420 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आले आहे.
मुंबईत नियंत्रण कक्ष
मुंबई, ठाणे आणि परिसरातील परिस्थितीबाबतही त्यांनी नियंत्रण कक्ष तसेच पालिका आयुक्तांकडून माहिती घेतली तसेच विशेषतः कोविड रुग्णांना त्यांच्या उपचारात काही अडथळे येणार नाही हे पाहण्याच्याही सूचना दिल्या.
रत्नागिरी जिल्ह्यातील 3 हजार 896 ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील 8 हजार 380 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.