Sunday, June 8, 2025
HomeराजकीयMaharashtra Politics : निवडणुकीनंतर किरण कुलकर्णींची बदली का केली? त्यांची नार्को टेस्ट...

Maharashtra Politics : निवडणुकीनंतर किरण कुलकर्णींची बदली का केली? त्यांची नार्को टेस्ट करा; फडणवीसांच्या लेखावर कॉंग्रेसचा पलटवार

मुंबई | Mumbai

- Advertisement -

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालांवरून काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. राहुल गांधींनी एका लेखात निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त करत आगामी बिहार निवडणुकीतही असेच प्रकार घडतील, असा दावा केला होता.

याला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लेख लिहून काँग्रेसच्या आरोपांना खोडून काढले आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधींचा लेख ज्या तीन वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाला, त्याच वृत्तपत्रांमध्ये फडणवीसांचा लेखही छापण्यात आला आहे. यावर आता महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शब्दांत पलटवार केला आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या लेखात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकड्यांवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करत लोकशाहीच्या रक्षणासाठी हे प्रश्न महत्त्वाचे असल्याचे म्हटले होते. विशेषत: वाढीव मतदानाच्या मुद्द्यावर त्यांनी आक्षेप घेतले. याला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या लेखात काँग्रेसवर गोंधळ निर्माण करण्याचा आरोप केला. फडणवीसांनी आपल्या लेखात निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेचा बचाव करत काँग्रेसचे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

फडणवीसांच्या लेखाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. “फडणवीस स्वत: आरोपी असताना लेख लिहून निवडणूक आयोगाला क्लीन चिट देत आहेत. त्यांचा कारभार रामशास्त्री प्रभुणे यांच्यासारखा नसून घाशीराम कोतवालासारखा आहे,” असा टोला सपकाळ यांनी लगावला. त्यांनी पुढे आरोप केला की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सूचनेवरून फडणवीसांनी हा लेख लिहिला आहे. “फडणवीस वकील आहेत, त्यामुळे आरोपींची बाजू घेण्यात ते पटाईत आहेत,” असेही सपकाळ म्हणाले.

सपकाळ यांनी निवडणूक आयोगातील अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या बदलीवरूनही गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “कुलकर्णी यांना निवडणुकीनंतर मराठी भाषा विभागात बदली करण्यात आली, जेणेकरून कोणताही पुरावा समोर येऊ नये. वाढीव मतदानाच्या आकड्यांबाबत त्यांना सर्व माहिती आहे.” सपकाळ यांनी कुलकर्णी यांची तातडीने नार्को चाचणी करण्याची मागणी केली आहे. तसेच, काँग्रेसने 200 मतदारसंघांचा डेटा समोर ठेवला असून, निवडणूक आयोगाने त्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज आणि मदरबोर्ड तपासावे, अशी मागणीही त्यांनी केली.

सपकाळ यांनी फडणवीसांवर खोटे बोलण्याचा थेट आरोप केला. “फडणवीस म्हणाले होते, वेगळा विदर्भ होईपर्यंत लग्न करणार नाही, पण ते लग्न झाले. राष्ट्रवादीसोबत जाणार नाही, असे म्हणाले, पण आता अजित पवारांसोबत सत्तेत आहेत. नारायण राणे आणि छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप करून नंतर त्यांना सोबत घेतले. आता निवडणूक आयोगालाही क्लीन चिट देत आहेत,” असे सपकाळ म्हणाले. त्यांनी गडचिरोलीतील खाणींच्या आर्थिक हितसंबंधांसाठी फडणवीस तिथे जात असल्याचा दावाही केला.

या प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपमधील वाद तीव्र होताना दिसत आहे. सपकाळ यांनी मिश्कीलपणे म्हटले की, “रामदास आठवले फडणवीसांच्या लेखाला चारोळीतून उत्तर देतील.” निवडणूक आयोगावर काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे आयोगाने द्यावीत, अशी अपेक्षा आहे. मात्र, सध्या तरी फडणवीस आणि काँग्रेसमधील शाब्दिक युद्धाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Accident : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
अंबासन । वार्ताहर Ambasan येथील निमधरा फाट्याजवळ डांबर वाहतूक करणार्‍या डंपरच्या धडकेत चाकाखाली दुचाकीस्वार सापडल्याने तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच कुटूंबीय नातेवाईकांनी...