अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच नितीश काबलिये यांना तीन वर्षांसाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सहभागास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. फेबु्रवारी महिन्यात अहिल्यानगर येथे झालेल्या 67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत एका सामन्यात काबलिये यांनी वादग्रस्त निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत समिती स्थापन करून चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत काबलिये यांना दोषी ठरवण्यात आले. त्यामुळे त्यांना आता तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
राज्य कुस्तीगीर संघाच्यावतीने काढलेल्या आदेशात म्हटले की, 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान नगरच्या वाडीयापार्क येथे 67 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. या कुस्ती स्पर्धेमध्ये गादी विभागातील महाराष्ट्र केसरी वजनगटातील अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांच्या कुस्तीमध्ये गादीवर मुख्य पंच म्हणून काम करत होता. कुस्ती दरम्यान दिलेल्या चितपटीच्या निकालावरून प्रचंड गोंधळ झाला, पै. राक्षे याने तुम्ही दीलेल्या निर्णयावर नाराज होऊन पंचाना मारहाण केली. पंचाना झालेल्या मारहाणीबाबत राज्य कुस्तीगीर संघाकडुन राक्षेवर शिस्तभंगाची कारवाई करत 3 वर्षाची स्पर्धा सहभाग बंदी घालण्यात आली.
दरम्यान, काबलिय यांनी दिलेल्या चितपटीच्या निर्णयावरून महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रामध्ये प्रचंड संभ्रमाचे वातावरण तयार झाले व उलट सुलट चर्चा होऊ लागल्या. याचे आवलोकन करून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलास कथुरे यांच्या अध्यक्षतेखाली या कुस्तीच्या निर्णयाबाबत चौकशी समिती स्थापण केली होती. चौकशी समितीचे प्रमुख कथुरे यांनी चौकशी समितीचा अहवाल 28 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास सादर केला. या अहवालामध्ये तुम्हला दोषी धरण्यात आले असल्याने तुमच्यावर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून 3 वर्षांसाठी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा सहभागास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याबाबत आपले मत मांडायचे असल्यास पुढील 7 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास लेखी स्वरूपात मत मांडावे, असे राज्य कुस्तीगीर संघाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
महेंद्र गायकवाडची शिस्तभंग शिथील
दरम्यान सेमी फायनल किस्ती कुस्तीमध्ये पैलवान महेंद्र गायकवाड याने पंचाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत कुस्ती अर्ध्यावर सोडून निघून जाणे पसंत केले होते. यामुळे त्यांच्यावर राज्य कुस्तीगीर संघाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाईवर गायकवाड याच्यावतीने खुलासा करण्यात येवून हा प्रकार गैरसमजुतीतून घडला असून त्याबाबत दिलगीरी व्यक्त करण्यात आली. यामुळे राज्य कुस्तीगीर संघाकडून गायकवाड याच्या विरोधात 3 वर्षासाठी पुढील कुस्ती स्पर्धेत सहभागी न होण्याचे आदेशात शिथीलता देण्यात आले असल्याचे पत्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सरचिटणीस योगेश दोडके यांनी काढले आहे.