मुंबई | Mumbai
राज्यात मान्सूनचा प्रवास जवळपास दोन आठवड्यापासून (Monsoon Rain) पूर्णपणे रखडल्याचे बघायला मिळत आहे.
२६ मे रोजी मुंबईत धडाक्यात आगमन करणाऱ्या मान्सूनने पहिल्याच दिवशी झोडपून काढले होते. तसेच महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे मान्सून पुन्हा एकदा सक्रीय कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत आता हवामान विभागाने अंदाज वर्तविला आहे. हवामान विभागाने ९ जूनला कोकणात तुरळक पाऊस पडेल. तर १० ते १२ जून दरम्यान पावसाचा वेग कमी राहील,असे म्हटले आहे. तसेच १३ जूनपासून मृग नक्षत्राच्या प्रारंभासह मान्सून पुन्हा सक्रीय होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तर १४ जूनपर्यंत पश्चिम किनारपट्टी वगळता राज्यातील विविध भागांमधील तापमानात (Temperature) वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, आणि खानदेशातील (Khandesh Rain) कमाल तापमान अधिक राहण्याचा अंदाज आहे. या दरम्यान पूर्व विदर्भात कमाल तापमानात अजून वाढ होऊन ते ४५ अंशापर्यंत जाण्याचा अंदाज आहे, तर विदर्भातील (Vidarbha rain) बऱ्याच भागात कमाल तापमान ४० अंशापेक्षा अधिक राहणार असल्याचा अंदाज आहे.
तसेच, खानदेश,उत्तर नाशिक आणि विदर्भाचा काही भाग हे मान्सूनपासून अद्याप वंचित आहेत. अनुकूल परिस्थिती अभावी मान्सूनचा वेग मंदावला आहे. असे हवामानशास्त्रज्ञ म्हणत आहेत. दुसरीकडे बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ व गडचिरोली या जिल्ह्यांसाठी (District) हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, कमाल तापमान अधिक राहणार असल्यामुळे आणि सार्वत्रिक मान्सूनचा पाऊस (Rain) अपेक्षित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी (प्रामुख्याने कोरडवाहू) पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून (Department of Agriculture) करण्यात येत आहे.