मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सहाय्यक कृषी अधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे. राज्यातील पूर परिस्थितीचे भान राखून मदतीचा निर्णय घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी कौतुक करुन आभार मानले आहेत.
सध्या राज्यातील १० हजार सहाय्यक कृषी अधिकारी पूरग्रस्त भागात पंचनामे, सर्वेक्षण, माहिती संकलन आणि अहवाल सादर करण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत. त्यांनी सप्टेंबर २०२५ महिन्याचे ऑक्टोबर महिन्यात देय असलेल्या वेतनातून एका दिवसाचे संपूर्ण वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याची माहिती राज्य कृषी सहाय्यक संघटनेचे राज्याध्यक्ष विलास रिंढे यांनी गुरुवारी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह राज्यातील सर्वच मंत्री विविध जिल्ह्यात जाऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करुन पूरग्रस्तांना दिलासा देत आहेत. या परिस्थितीचे भान राखून स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याबाबतचे पत्र महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव आणि सरचिटणीस राजेश सुर्वे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले आहे.





