मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्यासमवेत चैत्यभूमी, दादर येथे महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या जयंती महोत्सव येथे उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, आपल्या आजच्या एकसंघ भारताचे श्रेय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेल्या संविधानाला (Constitution) जाते. यंदा आपण संविधानाची 75 वर्ष पूर्ण झाल्याने अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे. “He was nation builder.” देश तयार करण्याकरिता, देशाचा पाया तयार करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असे म्हणत त्यांनी सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, देशाला चुकीच्या रुढी-परंपरांमधून बाहेर काढून समता स्थापित करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. संविधानाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा समान अधिकार, संधीची समानता दिली. म्हणूनच, मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा भारताचे संविधान प्रिय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कारण, भारताच्या (India) विकासाच्या वाटचालीत, विकसित भारत घडवण्यामध्ये संविधानाचा मोलाचा वाटा असणार आहे, असेही त्यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजोत्थानाचा विचार कधीही सोडला नाही आणि संधी मिळाली त्यावेळी त्यांनी समाजनिर्मितीचे अतुलनीय कार्य केले. विशेषतः संपूर्ण विश्वाला शांतीच्या व विचारांच्या जोरावर जिंकलेल्या भगवान गौतम बुद्ध यांचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्विकारले. त्यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा गाभा असलेला समता व बंधुतेचा शाश्वत विचार मांडला व रुजवला, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनीच कुठल्याही परिस्थितीत संवैधानिक मूल्यांपासून तसूभरही दूर होणार नाही, आपल्यासाठी संविधान सर्वोच्च असेल आणि आपण संविधानानुसारच चालण्याचा प्रयत्न करु, असा संकल्प घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. तसेच यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्विकारलेल्या कामगार विभाग, पाटबंधारे विभाग, ऊर्जा विभागाच्या माध्यमातून उत्तम प्रशासक म्हणून कार्य केल्याचे सांगितले. तसेच कोलंबिया विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याविषयीचा तत्कालीन घटनाक्रमही सांगितला. स्वतःचा विचार न करता समाजाचा, देशाचा, विश्वकल्याणाचा विचार करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री ॲड. आशिष शेलार, मंत्री संजय राठोड, आ. संजय शिरसाट, आ. भाई गिरकर, मुख्य सचिव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.