मुंबई | Mumbai
राज्यात महायुती सरकारला (Mahayuti Government) पुन्हा सत्तेत आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazhi Ladki Bahin Yojana) गेमचेंजर ठरली होती. यानंतर ही योजना बंद होणार असल्याच्या वावड्या विरोधकांकडून उठवल्या जात आहेत. पंरतु, अद्याप ही योजना बंद झालेली नाही. दुसरीकडे ही योजना निधीवरुन सातत्याने चर्चेत असते. या योजनेसाठी सरकारच्या विविध विभागांचा निधी वळवल्याची तक्रार सातत्याने केली जात आहे.
महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्यातील हप्त्यासाठी आदिवासी विभागाचा (Tribal Department) तब्बल ३३५ कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी सामाजिक विधी व न्याय विभागाचा निधी या योजनेसाठी वळल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता. यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या सगळ्या आरोपांवर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागांचा निधी पळवल्याचा आरोप केला जात आहे तो पूर्णपणे खोटा आहे. हा अतिशय चुकीचा दावा आहे. अर्थसंकल्पाची पद्धत ज्यांना समजत नाही ती मंडळी असा आरोप करू शकतात. कारण, अर्थसंकल्पाच्या नियमानुसार वैयक्तिक लाभासाठी जो निधी दिला जातो, तो आदिवासी विभागातच दाखवावा लागेल, अनुसूचित जाती व सामाजिक न्याय विभागातच तो दाखवावा लागेल. यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनीही सभागृहात खुलासा केला आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
पुढे ते म्हणाले की, “साधारणपणे या विभागांचे बजेट पावणे दोन पटींनी वाढले आहे, त्यामुळे ही अकाऊंटिंगची पद्धत आहे. कुठलाही पैसा पळवलेला नाही, कुठलाही पैसा वळवलेला नाही. अर्थसंकल्प (Budget) ज्यांना कळत नाही त्यांनी माझ्याकडे यावे, त्यांना अर्थसंकल्प कसा वाचावा हे जे मी लिहिलेले पुस्तक आहे ते देईल”, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी आरोप करणाऱ्यांना लगावला.