मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
राज्यातील शेतकऱ्यांची (Farmer) शक्ती, आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक विकासाचा संदेश देणाऱ्या कृषी विभागाच्या (Agriculture Department) नव्या बोधचिन्हाचे आणि घोषवाक्याचे मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. बोधचिन्हावर ‘शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी’ असे घोषवाक्य आहे. तब्बल ३८ वर्षानंतर कृषी विभागाने नवे बोधचिन्ह स्वीकराले आहे.
महाराष्ट्राची (Maharashtra) शेती ही परंपरेशी जोडलेली असूनही सतत नव्या दिशेने वाटचाल करणारी आहे. कृषी विभागाचे हे नवे बोधचिन्ह (Unveils New Emblem) म्हणजे केवळ प्रतीक नाही, तर महाराष्ट्राच्या शेतीचा आधुनिक चेहरा आहे. हे बोधचिन्ह आणि घोषवाक्य राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रगतीचे प्रतीक बनेल. हा बदल म्हणजे नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ आहे, अशी प्रतिक्रिया भरणे यांनी यावेळी दिली.
कृषी विभागाचे सध्याचे बोधचिन्ह सुमारे ३८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. या कालावधीत शेती तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, हवामानबदल आणि उत्पादनाच्या नव्या दिशा अशा अनेक मूलभूत परिवर्तनांच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाची दृश्य आणि संवादात्मक ओळख अद्ययावत करण्याची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे विभागाला नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य देण्याचा निर्णय झाला. दरम्यान, यावेळी बोधचिन्ह स्पर्धेतील विजेते वीरेंद्र भाईदास पाटील आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या सिद्धी भारतराव देसाई यांचा कृषी विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दरम्यान, सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बोधचिन्ह अनावरणावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश कुमार, कृषी आयुक्त सुरज मांढरे आदी उपस्थित होते.




