मुबंई | Mumbai
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ (Mnister Narhari Zirwal) यांच्या मंत्रालय कार्यालयातील लिपीक राजेंद्र ढेरिंग याला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (ACB) ३५ हजारांची लाच घेताना पकडले होते. या घटनेमुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. यावरून झिरवाळ यांच्यावर विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली होती. या प्रकरणावर भाष्य करतांना त्यांनी ‘आपल्या या प्रकरणाशी काहीही संबध नसल्याचे म्हणत दोषी आढळल्यास राजीनामा देईल, असे म्हटले होते. यानंतर आता राष्ट्रवादीच्या बैठकीत सर्वोच्च नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी झिरवाळ यांच्यासमोर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
काल (सोमवारी) राष्ट्रवादीच्या आमदारांची (MLA) देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (DCM Sunetra Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी स्वतःच्या आणि पक्षाच्या प्रतिमेची काळजी घ्यावी. प्रशासनातील अधिकार्यामुळे बदनामी होणार नाही, याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचना झिरवाळ यांना केल्याचे बोलले जात आहे. याशिवाय पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी देखील त्यांना याप्रकरणी सूचना केल्याचे समजते. यानंतर आता नरहरी झिरवाळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेऊ घेऊन त्यांच्यासमोर आपली बाजू मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
झिरवाळ काय म्हणाले होते?
या प्रकरणात आरोप झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले होते की,”माझ्या विभागातील क्लार्क लाच प्रकरणात सापडला ही माझीही जबाबदारी आहेच, ही जबाबदारी नाही म्हणून चालणार नाही. त्याने जे कृत्य केलंय, त्या कृत्याला आम्ही पाठीशी घालणार नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि चौकशीत जर या प्रकरणाचे धागेदोरे माझ्यापर्यंत आले तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन,” असे त्यांनी म्हटले होते.





