मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhansabha Election) संदर्भात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी (आज) रविवारी केला. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि तत्कालीन अधिकारी किरण कुलकर्णी यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी करतानाच सपकाळ यांनी यामुळे महाराष्ट्रातील मतांच्या चोरीचे सत्य उघड होईल, असा दावा केला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाच्या संदर्भात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लिहिलेल्या लेखाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रतिवाद केला. फडणवीस यांनी आपल्या लेखात राहुल गांधी यांचे मुद्दे खोडून काढले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि फडणवीस यांच्यावर टीका केली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील (Vidhansabha Election) मतांच्या चोरीच्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. पण त्याची मिरची मात्र भाजपला लागली. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत. त्यामुळे त्याची उत्तरे त्यांनी देणे अपेक्षित असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी लेख लिहून उत्तरे दिली आहेत. फडणवीस यांचा लेख हास्यास्पद असून राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुद्देसुद उत्तरे देण्याऐवजी टीका करत जनतेला भ्रमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, असे सपकाळ म्हणाले.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप युती हीच मतांच्या चोरीचे लाभार्थी आहेत. ते आरोपी असून सत्तेचा मलिदा लाटत आहेत आणि तेच उत्तरे देत आहेत. तुम्ही रामशास्त्री प्रभुणेंच्या अविर्भावात वावरू नका, तुमचा कारभार तर घाशिराम कोतवालचा आहे. फडणवीस यांनी दिलेली उत्तरे ही थातूर मातूर आहेत. आता तर त्यांनी निवडणूक आयोगालाही क्लिन चिट देऊन टाकल्याने संशय अधिक बळावला आहे. ‘दाल में कुछ काल नही’ तर सर्व दाळच काळी आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली.
राहुल गांधींनी एकूण प्रक्रियेवर उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन करण्याचे काम निवडणूक आयोगाचे आहे. पण आयोग उत्तर देत नाही, सीसीटीव्ही फूटेज देत नाही, उलट नियम बदलून टाकले. निवडणूक आयुक्त नियुक्तीवर फडणवीस बोलले. पण काँग्रेसच्या काळातच टी. एन. शेषन निवडणूक आयुक्त झाले आणि त्यांनी आचारसंहिता काय असते ते दाखवून दिले. पण भाजपच्या मोदी सरकारने तर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती पॅनलमधून सरन्यायाधीश यांना वगळून आपल्याच एका मंत्र्यांची त्या जागी वर्णी लावली हे सांगण्यास फडणवीस विसरले आहेत. फडणवीस यांच्या लेखाला लेखाने उत्तर देण्याची गरज वाटत नाही. त्यावर एखाद्या चारोळीतूनच उत्तर दिले जाऊ शकते, असा टोलाही हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी लगावला.