कोल्हापूर | प्रतिनिधी | Kolhapur
जून २०२४ पूर्वी देण्यात आलेल्या शिक्षक नियुक्त्त्यांना पवित्र पोर्टलचे (Pavitra Portal) कारण देऊन मान्यता नाकारता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) कोल्हापूर खंडपीठाने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ नुकतेच दि. १८ ऑगस्टपासूनच सुरु झाले आहे. त्यात हा पहिलाच शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्वपूर्ण निकाल दिला आहे.
त्यामुळे मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना (Teachers) मोठा दिलासा मिळाला आहे. या खटल्याची माहिती अशी, श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ, कोडोली संचलित यशवंत हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय कोडोली येथे रितसर भरती प्रक्रियेतून संस्थेने अवधूत गोरखनाथ कुंभार यांची १ ऑक्टोंबर २०२१ पासून सहाय्यक शिक्षक म्हणून शिक्षणसेवकपदी नियुक्ती केली होती.
या नियुक्तीस कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पवित्र पोर्टलचे कारण देऊन वैयक्तिक मान्यता नाकारली होती. त्याविरुद्ध संबंधित संस्थेच्या शाळेने तसेच शिक्षक सेवकांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकत्रितरित्या पुनर्विचार (रिट) याचिका दाखल केली होती. ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ सुरू झाल्यानंतर, कोल्हापूर खंडपीठाकडे सुनावणीसाठी (Hearing) वर्ग करण्यात आली होती. या याचिकेची दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी अंतिम सुनावणी झाली.
कोल्हापूर खंडपीठाने (Kolhapur Bench) निकाल देताना जून, २०२४ पूर्वीच्या नियुक्त्यांना पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेचे कारण देऊन मान्यता नाकारता येणार नाही, असे मत नोंदवून संबंधित शिक्षण सेवकाच्या नियुक्तीस वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी देणेबाबत तसेच थकित वेतन अदा करण्याचे आदेश दिले. या निकालामुळे (Result) राज्यभरातील अशा प्रकारच्या सहाय्यक शिक्षकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.




