मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
राज्यात फेब्रुवारी ते मे २०२५ या तीन महिन्यांच्या कालावधीत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा ३ लाख ९८ हजार ६०३ शेतकऱ्यांना बसला होता. यामुळे १ लाख ८७ हजार ५३.२१ हेक्टर क्षेत्रातील शेत पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीच्या मदतीपोटी राज्य सरकारने ३३७ कोटी ४१ लाख ५३ हजार रुपये इतक्या निधीस मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील (Minister Makarand Jadhav-Patil) यांनी दिली.
शेतकरी (Farmer) मदतीच्या या निधीत छत्रपती संभाजीनगर विभागामधील ६७ हजार ४६२ शेतकऱ्यांच्या ३४ हजार ५४२.४६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ५९ कोटी ९८ लाख २० हजार, पुणे विभागातील १ लाख ७ हजार ४६३ शेतकऱ्यांच्या ४५ हजार १२८.८८ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८१ कोटी २७ लाख २७ हजार, नाशिक विभागातील १ लाख ५ हजार १४७ शेतकऱ्यांच्या ४५ हजार ९३५.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ८५ कोटी ६७ लाख ८ हजार, कोकण विभागातील १३ हजार ६०८ शेतकऱ्यांच्या ४ हजार ४७३.६९ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ९ कोटी ३८ लाख २४ हजार, अमरावती विभागातील ५४ हजार ७२९ शेतकऱ्यांच्या ३६ हजार १८९.८६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ६६ कोटी १९ लाख ११ हजार आणि नागपूर विभागातील ५० हजार १९४ शेतकऱ्यांच्या २० हजार ७८३.१६ हेक्टर बाधित क्षेत्रावरील पिकासाठी ३४ कोटी ९१ लाख ६३ हजार रुपये मदतीचा समावेश आहे.
दरम्यान, अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) नुकसानग्रस्त बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत बाधित पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात येऊन शेतकऱ्यांच्या मदतीसाठी (Help) हा निधी मंजूर करण्यात आल्याने बाधित शेतकऱ्यांकडून याबाबत समाधान व्यक्त होत आहे, असेही जाधव-पाटील म्हणाले.
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी – जाधव-पाटील
राज्यातील अनेक जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२५ या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. अवकाळी पावसामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या निधीस तातडीने मान्यता दिली असल्याचे मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.




