मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या मालकीच्या कंपनीने पुण्यातील (Pune) कोरेगाव पार्क येथील ४० एकर १८०० कोटी रुपये किंमत असलेली जमीन ३०० कोटी रुपयांत विकल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला. तसेच या व्यवहारात तब्बल २५ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली असून,केवळ ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी भरून हा व्यवहार पूर्ण झाला आहे, असेही त्यांनी म्हटले.
यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत कुठेही अनियमितता झाली असेल तर कारवाई झालीच पाहिजे, असे म्हणत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर आता याप्रकरणात तहसलिदारांचे निलंबन करण्यात आले आहे.कोरेगाव पार्क (Koregaon Park) येथील जमीन व्यवहार प्रकरणात अनियमितता आढळून आल्याने पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना निलंबित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच याप्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) किंवा त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे या प्रकरणावर पवार काय भूमिका मांडतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच या प्रकरणात तलाठी, सर्कल, तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांनी नेमके कशा नोंदी दाखवल्या? जिल्हाधिकाऱ्यांकडे नेमकी कधी कागदपत्रे दिली, या व्यवहारात गुप्तता का ठेवली ? यानुषंगाने चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे.
दुय्यम निबंधक रवींद्र तारूही निलंबित
पार्थ पवार यांच्या कंपनीसाठी झालेल्या जमीन व्यवहारप्रकरणी तहसीलदारांनंतर दुय्यम निबंधक रवींद्र तारुही यांनाही निलंबित करण्यात आले आहे. नोंदणीच बेकायदा असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. ४० एकर जागेचा बेकायदा व्यवहार करुन मूळ मालक आणि सरकारची फसवणूक करीत, पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीने ही जागा खरेदी केल्याचे मुद्रांक शुल्क विभागाच्या प्राथमिक चौकशीत पुढे आल्याचे बोलले जात आहे.




