मुंबई | Mumbai
राज्यात मागील काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) हुंडाबळी प्रकरण चांगलेच गाजत आहे.सासरच्या मंडळींनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याने आणि वारंवार पैशांची मागणी केल्याच्या कारणातून २३ वर्षीय वैष्णवीने आपले आयुष्य संपवले. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून, याप्रकरणी पोलिसांनी (Police) एकूण दहा जणांना अटक केली आहे. ही घटना ताजी असताना आता राज्य सरकारमधील कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या मुलावर एका विवाहित महिलेने अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. तिने एका वकिलामार्फत तक्रार दाखल केली आहे.
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांचा मुलगा सिद्धांत शिरसाटने (Siddhant Shirsat) विवाहित महिलेची (Married Woman) फसवणूक, मानसिक आणि शारिरीक छळ, जीवे मारण्याची धमकी, तसेच हुंडा मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महिलेने केली आहे. याशिवाय महिलेने इतरही अनेक गंभीर आरोप सिद्धांत शिरसाटवर केले आहेत. छत्रपती संभाजी नगरमधील वकिल चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत महिलेने सिद्धांत शिरसाट यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.
नेमकं प्रकरण काय?
संबंधित महिलेच्या दाव्यानुसार, सिद्धांत शिरसाट आणि या महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून २०१८ मध्ये ओळख झाली होती. ओळखीचे पुढे मैत्रीत रुपांतर झाले. पुढे चेंबूर येथील एका फ्लॅटवर प्रत्यक्ष भेटही झाली होती. यानंतर सिद्धांतकडून महिलेकडे लग्नासाठी तगादा लावला जात होता. परंतु, महिला आधीच विवाहित होती. सिद्धांत यांनी ब्लॅकमेल करत लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करेन असा आग्रह धरला होता. यानंतर सिद्धांतच्या भावनिक आवाहनावर विश्वास ठेऊन लग्न केले, असा दावा महिलेने केला आहे. सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत १४ जानेवारी २०२२ रोजी विवाह केल्याचा दावाही या महिलेने केला आहे. लग्नानंतर मात्र सिद्धांतच्या वर्तणुकीत बदल झाला. त्यांनी मला चेंबूरमधील फ्लॅटमध्येच राहण्यास सांगितले. छत्रपती संभाजीनगरला येण्यास नकार दिला होता. तू जर पोलिसांकडे गेली तर मी आत्महत्या करेन आणि तुझं संपू्र्ण कुटुंब उद्ध्वस्त करेन अशी धमकीही दिली जात होती, असा आरोप या महिलेने केला आहे.