मुंबई | Mumbai
राज्यातील शालेय शिक्षणात इयत्ता पहिलीपासून हिंदी (Hindi) भाषा सक्तीच्या निर्णयाला विविध संघटनांकडून कडाडून विरोध केला जात आहे. तसेच या हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाकडून राज्यभर जोरदार आंदोलन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर मराठी अभ्यास केंद्राकडून आज मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानात आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे नेते नितीन सरदेसाई, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अन्य विरोधी पक्ष सहभागी झाल्याचे दिसून आले.
तसेच काही मराठी कलाकारही या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी ठाकरे गटाकडून हिंदीच्या जीआरची आझाद मैदानावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये प्रतिकात्मक होळी करण्यात आली. दरम्यान या आंदोलनापूर्वी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस मराठी अभ्यास केंद्राच्या प्रमुखांसह इतर समविचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर सरकारच्या जीआरची होळी करण्यात आली. तर या आंदोलनाला ठाकरेंचे शिवसैनिक, तसेच महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.
त्यानंतर उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही दबाव आणू इच्छित नाहीत. आम्ही हे स्वीकारतच नाहीत. ते एखादी गोष्ट लादणार असतील तर आम्ही आमच्या वतीने तो विषय संपवला आहे. आम्ही त्या जीआरची होळी केली आहे. त्यामुळे तो जीआर (GR) आहे असे मानण्याचे कारण नाही. आम्ही हिंदीची सक्ती लादू देणार नाहीत”, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, ” जर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले असतील की, मोर्चा काढण्याची वेळ येऊ देणार नाही तर ही आनंदाची गोष्ट आहे. कोणी तरी एक धाडस दाखवत आहे. सर्वच जण गुलाम झालेले नाहीत. त्याबद्दल कौतुक आहे. मोर्चा कशासाठी काढावा लागतोय? हे त्यांच्या लक्षात आलेले नाही. महाराष्ट्रात (Maharashtra) मराठी भाषेवर जो अन्याय होत आहे त्यासाठी हा मोर्चा निघत आहे. सगळ्यांची मुलं त्या वयात मुलं मोठी होत असतात. त्यांच्यावर त्या वयात किती भार टाकणार? हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे”, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.





