मुंबई | Mumbai
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे (Shivsena UBT) प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत पावसामुळे नुकसान झालेल्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या (Farmer) मदतीसाठी वेगवेगळ्या मागण्या केल्या. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) हे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी सरकारकडे केलेल्या मागणीचे पत्र उद्धव ठाकरेंनी वाचून दाखवत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “गेल्या आठवड्यात मी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. लोकांना भेटलो. त्यानंतर तुमच्याशी बोललो. सरकारला विनंती केली की राजकारण न करता यावर मार्ग काढावा. पण सरकारची तशी तयारी आहे हे वाटत नाही. मुख्यमंत्री (CM) जाहिरातीत व्यस्त असून, दुसरे उपमुख्यमंत्री पाकिटावर फोटो छापण्यात मग्न आहेत. तर जनता वाऱ्यावर आहे.आज शेतकऱ्याचे पीक उद्ध्वस्त झाले असून, शेतकरी रोज आत्महत्या करत असल्याच्या बातम्या येत आहेत. साखर सम्राट भाजपमध्ये गेल्यास त्याच्या कर्जाची हमी सरकार घेत असेल तर शेतकऱ्यांनी भाजपमध्ये येण्याची वाट पाहत आहे का? शेतकरी भाजपमध्ये आल्यावर कर्ज माफ करणार आहे का? “असा सवालही त्यांनी केला.
पुढे ते म्हणाले, “आज बातमी आली की शेतकऱ्यांवर सरकारचा पूरभार. काही साखर सम्राट भाजपमध्ये गेले आणि शेकडो करोडोंच्या कर्जावर त्यांनी थकहमी मिळवली. आम्ही गरिबांसाठी मागणी करत आहोत. ज्या शेतकऱ्यांना जमीन गहाण टाकावी लागते, बैलजोडी, पत्नीचे मंगळसूत्र गहाण टाकावे लागते. त्याशिवाय कर्ज मिळत नाही”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
फडणवीसांचे पत्र दाखवलं वाचून
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस हे जेव्हा विरोधी पक्षनेते होते त्यावेळी त्यांनी लिहिलेले पत्र वाचून दाखवले. ते म्हणाले की, “ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी. तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशीही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना केली होती. याशिवाय फडणवीसांनी तेव्हा सरकारकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, आता हेच फडणवीस शब्दांचा खेळ करत आहेत असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पदानुसार संज्ञा बदलतात का? अशी विचारणा फडणवीसांना केली.
मुजरे मारायला दिल्लीत जाता, आता लोकांसाठी जा
राज्याचे मुख्यमंत्री हे पंतप्रधानांना भेटून आलेत. मुख्यमंत्री आणि दोन हाफ उपमुख्यमंत्री यांचे प्रस्ताव बनवणे चालू आहे, त्यांचा अभ्यास सुरू आहे. केंद्राचे पथक अजूनही राज्यात आले नाही, पंचनामे कधी होणार, निर्दयीपणे सगळा कारभार सुरू आहे. ओला दुष्काळ म्हणा किंवा तुमच्या अकलेचा दुष्काळ म्हणा पण शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे, शब्दाचे खेळ करू नका. मुजरे मारायला दिल्लीत जाता, आता लोकांसाठी दिल्लीत जा, असेही उद्धव ठाकरेंनी सरकारला सुनावले.





