नवी दिल्ली | New Delhi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज (बुधवारी) केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक (Centre Government Cabinet Meeting) पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, यात महाराष्ट्रासाठी दोन निर्णयांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Minister Ashwini Vaishnav) यांनी याबाबत आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील निर्णयांची माहिती दिली. या निर्णयांमुळे मुंबई आणि पुण्याच्या नागरिकांना थेट आणि प्रत्यक्ष फायदा होणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या (Metro Project) दुसऱ्या टप्प्याअंतर्गत लाईन ४ खराडी–हडपसर–स्वारगेट–खडकवासला आणि लाईन ४ अ नळस्टॉप–वॉरजे–माणिक बाग या दोन्ही मार्गांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. लाईन २ अ (वनाज-चांदणी चौक) आणि लाईन २ ब (रामवाडी-वाघोली/विठ्ठलवाडी) यांनाही मान्यता देण्यात आली असून, फेज २ अंतर्गत मंजूर झालेला हा दुसरा मोठा प्रकल्प असल्याचे त्यांनी म्हटले. पुण्यात सध्या लाईन ३, लाईन १, लाईन २ अ आणि लाईन २ ब या मेट्रो मार्गिकेंचे काम सुरु आहे. मात्र, आता आणखी दोन मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे.
एकूण ३१.६३६ किमी लांबीच्या आणि २८ मेट्रो स्थानक असलेल्या लाईन्स ४ आणि ४ अ, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम पुण्यातील आयटी हब, व्यावसायिक क्षेत्रे, शैक्षणिक संस्था आणि निवासी क्लस्टरना जोडली जाणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण होणार असून या दोन्ही मेट्रो मार्गांसाठी (Metro Line) अंदाजे ९८५८ कोटी रुपयांचा निधी खर्च येणार आहे. यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार आणि बाह्य द्विपक्षीय/बहुपक्षीय निधी संस्था संयुक्तपणे निधी देणार आहेत.पुढच्या पाच वर्षांत हे दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत असल्याचे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
तसेच केंद्र सरकारने (Central Government) बदलापूर ते कर्जतपर्यंतच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकांना मंजुरी दिली आहे. बदलापूर-कर्जत कॉरिडोअरने लोकल वाहतुकीला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि उपनगरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाला १३२४ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे, अशी देखील महत्त्वाची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.




