मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात संपणार असल्याने काँग्रेसने (Congress) विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगितला आहे. दानवे यांच्या निवृत्तीनंतर रिक्त होणाऱ्या विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसकडून सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांचे नाव आघाडीवर आहे. सध्या सतेज पाटील हे विधानपरिषदेत काँग्रेसचे गटनेते म्हणून कार्यरत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) दानवे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात म्हणजे २९ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यानुसार त्यांना अधिवेशनात निरोप देण्यात आला. तरीही दानवे हे २९ ऑगस्टपर्यंत विरोधी पक्षनेतेपदावर असणार आहेत. औरंगाबाद- जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेल्या अंबादास दानवे यांच्या निवृत्तीने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधानपरिषदेतील संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे काँग्रेसने जास्त संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे.
विधानपरिषदेत काँग्रेसचे सात तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) तीन सदस्य आहेत. याशिवाय काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा काँग्रेसला आहे. या आधारे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. दिल्लीतून (Delhi) पाटील यांच्या नावाला हिरवा कंदील मिळाल्याचे सांगण्यात येते.
विधानसभेत सध्या विरोधी पक्षनेता नाही. पंधराव्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) विरोधी पक्षाचे एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के उमेदवार निवडून आलेले नाहीत. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय प्रलंबित ठेवला आहे. शिवसेना ठाकरे गटाने विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नियुक्तीचे पत्र नार्वेकर यांना दिले आहे. विधानसभेत भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या नावाला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गटाचा पाठिंबा मिळेल, असा काँग्रेसला विश्वास आहे.




