मुंबई | Mumbai
आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (Mumbai NMC Election) काँग्रेस ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे मोठे वक्तव्य काँग्रेसचे (Congress) नेते भाई जगताप यांनी केले. त्यामुळे काँग्रेस मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर जगताप यांच्या विधानामुळे मविआतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
यावेळी ते म्हणाले की, “मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही ही गोष्ट ‘डंके की चोट’ पर सांगितली होती. आता आमच्या राजकीय कामकाज समितीची जी बैठक झाली त्यामध्ये देखील आम्ही सर्वांनी हेच सांगितले. मी रमेश चेन्निथला यांच्यासमोर ही गोष्ट मांडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात नेत्यांच्या नाही. काँग्रेसला १४० वर्षे झाली आहेत. कार्यकर्ते पक्षाचे झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन फिरतात. त्यांचीही इच्छा असते आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी. ही कार्यकर्त्यांची लढाई आहे ती कार्यकर्त्यांनाच लढवू द्या. यामध्ये आम्हाला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही”, असेही भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मविआत आले तेव्हा शिवसेना (Shivsena) एकटीच होती.आता दोन शिवसेना झाल्या आहेत. मविआत शिवसेना एकटीच नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत स्बळावर लढण्याबाबतचा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांवरच सोडावा. स्थानिक कार्यकर्त्यांची ठाकरे बंधूंसोबत एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा नाही, असेही भाई जगताप यांनी सांगितले. तर मनसेसोबत आमचे मुलभूत मतभेद आहेत, त्यामध्ये काही शंका नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक नेत्यांशी चर्चा करुन वरिष्ठ नेते निर्णय घेतात. त्यामुळे काँग्रेस हायकमांड याबाबत सगळ्यांशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेईल, असे काँग्रेसच्या मिडिया सेलचे प्रमुख सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी म्हटले.




