मुंबई | Mumbai
मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांच्या (Mahapalika Election) सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवार (दि. २३) पासून अर्ज भरण्यास सुरुवात होत असून महायुती अथवा महाविकास आघाडीत (Mahayuti and Mahavikas Aagahdi) अद्याप युती-आघाडीच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. एकाही महानगरपालिकेत युती आणि आघाडीसंदर्भात सत्ताधारी किंवा विरोधकांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
महापालिका निवडणुकीसाठी पुढील महिन्यात १५ जानेवारीला मतदान (Voting) होत आहे. निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून काही महापालिकांमध्ये युती आघाडीत जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. प्रामुख्याने मुंबईत महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला (NCP Ajit Pawar) सोबत घ्यायचे की नाही यावरून घोळ सुरू आहे. तर काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात जागावाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या पार पडत आहेत.
नागपूर, याशिवाय नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई या महत्त्वाच्या महापालिकांसह इतर महापालिकांमध्ये युती आघाडीबाबत अद्याप स्पष्टता नाही. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर युती आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आयत्या वेळी पदरात आलेल्या जागांवर उमेदवार निश्चित करणे आणि निश्चित झालेल्या उमेदवाराला अर्ज भरण्यासाठी करावी लागणार आहे. धावपळ करावी लागणार आहे.
ठाकरे बंधूचे जागा वाटप अंतिम टप्प्यात
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असून येत्या एक-दोन दिवसात युतीची घोषणा केली जाणार असल्याचे समजते. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीची घोषणा १०० टक्के होणार असून ती एकत्रितपणे, धूमधडाक्यात आणि वाजतगाजत केली जाईल, असे सोमवारी जाहीर केले.
जागावाटपासंदर्भात ‘मातोश्री’वर बैठकांचा जोर
मुंबई महापालिकेच्या जागावाटपासंदर्भात ‘मातोश्री’वर आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठकांचे सत्र पार पडले. यात मनसेला किती आणि कोणत्या जागा द्यायच्या याविषयीची चर्चा झाल्याचे समजते. मनसेकडून प्रामुख्याने शिवडी, वरळी, दादर, माहिम तसेच भांडूपमधील काही जागांचा आग्रह धरण्यात आला होता. यावरही सखोल चर्चा झाल्याचे समजते. शिवडीमध्ये पक्षाच्या आजी-माजी आमदारांकडूनच काही जागांसाठी आग्रह धरला गेला असून त्यावरही यावेळी चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना युतीबाबतची माहिती दिली.
निवडणूक कार्यक्रम
महापालिका निवडणुकीसाठी ३० डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ३१ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. २ जानेवारी २०२६ ही अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. ३ जानेवारी रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हवाटप होऊन त्याच दिवशी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. तर १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जातील.
उमेदवारी अर्ज ऑफलाईन भरता येणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन उमेदवारी अर्ज आणि शपथपत्रे दाखल करण्याची सुविधा राज्य निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु विविध राजकीय पक्ष आणि उमेदवारांची मागणी लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकीत ऑफलाईन पद्धतीनेच उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.




