मुंबई | Mumbai
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) पार पडणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पक्षाच्या गोटात हालचाली सुरु असून, निवडणुकीसाठी चाचपणी केली जात आहे. मागील वर्षी राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) तर विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (NCP Sharad Pawar) मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ‘पवार साहेबांनी मला भरपूर संधी दिल्या, तब्बल सात वर्षे मी या पदावर काम केले.आता नव्या चेहऱ्यांना संधी देणं गरजेचं आहे. तुमच्यासमोरच मी साहेबांना विनंती करतो, अशी भावनिक साद घालत प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज सकाळपासून माध्यमांमध्ये जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त झळकले होते. मात्र, आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी जयंत पाटलांच्या राजीनाम्याचे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे म्हटले आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर (ट्विट) पोस्ट करत म्हटले की, ” मा. जयंत पाटील साहेब हे प्रदेशाध्यक्ष (President) आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या (Resignation) बातम्या प्रसारीत होणे, हा निव्वळ खोडसाळपणा आहे. पक्ष एका नियमानुसार अन् शिस्तीनुसारच चालत असतो,” असे म्हणत त्यांनी राजीनाम्याचे वृत्त फेटाळले आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांचे नाव चर्चेत आहे. तसेच शिंदे हे १५ जुलै रोजी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे पक्षाचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) माध्यमांशी बोलताना जयंत पाटलांच्या राजीनाम्याचे वृत्त मान्य करत नवीन प्रदेशाध्यक्ष १५ जुलै रोजी जाहीर होईल आणि ते नाव जयंत पाटील हेच जाहीर करतील, असे म्हटले आहे. त्यामुळे या घडामोडी आता कुठपर्यंत जातात? ते पाहणे महत्त्वाचे असणार आहे.




