मुंबई | Mumbai
सत्ता महापालिकेतील स्थापनात पहिला आणि महत्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या महापौर पदाच्या आरक्षणासाठी (Mayor Post Reservation) आज (गुरुवारी) मंत्रालयात सोडत काढली जाणार आहे. महापौर पदाच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी ही सोडत आहे. या सोडतीनंतर महापौर पदाची लॉटरी कुणाला लागली, हे स्पष्ट होईल. महापौर पदाच्या आरक्षणात स्पष्टता आल्यानंतर महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या घडामोडीना वेग येणार आहे. आजच्या आरक्षण सोडतीत सर्वाधिक प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई महापौर पदाच्या (BMC) सोडतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान (Voting) होऊन दुसऱ्या दिवशी निकाल जाहीर झाले. १६ जानेवारीला निकाल घोषित झाल्यापासून मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगरच्या महापौर पदासाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात रस्सीखेच सुरु आहे. याशिवाय भिवंडी, चंद्रपूर येथेही महापौर पद पटकवण्यावरून काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट यांच्यात चढाओढ लागली आहे. या पार्श्वभूमीवर आज महापालिकांच्या महापौर पदाची सोडत निघत आहे.
नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Minister Madhuri Misal) यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी ११ वाजता मंत्रालयातील परिषद सभागृहात महापौर पदाची आरक्षण सोडत निघेल. या सोडतीत कोणत्या महापालिकेतील महापौर पद आरक्षित झाले आणि कोणत्या महापालिकेत खुल्या प्रवर्गातील महापौर बसणार हे स्पष्ट होईल. सुरुवातीला अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सोडत निघेल. त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढली जाईल. यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण असणार आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
या महापालिकांसाठी आरक्षण सोडत
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, भिवंडी निजामपूर, पनवेल, नाशिक, अहिल्यानगर, मालेगाव, धुळे, जळगाव, नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी सोलापूर, छत्रपती संभांजीनगर, परभणी, जालना, लातूर, नांदेड




