मुंबई | Mumbai
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षाचा महाविकास आघाडी’मध्ये (MVA) समावेशावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मविआतील घटक पक्ष असणारी ठाकरेंची शिवसेना मनसेला सोबत घेण्यास उत्सुक आहे. पंरतु, राज्यातील काँग्रेस मात्र तयार नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट काँग्रेसच्या दिल्लीतील श्रेष्ठींना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पत्र लिहून तक्रार केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत यांनी काँग्रेस श्रेष्ठींना लिहिलेल्या पत्रात सपकाळ यांचा मनसेला ‘महाविकास आघाडी’त घेण्यास तीव्र विरोध आहे. हा विरोध त्यांनी स्वत: राऊत यांच्याकडे स्पष्टपणे व्यक्त केला होता. विशेष म्हणजे, हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी राऊत यांना पत्र लिहून ‘राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा करून कळवतो,’ असे सांगितले होते. मात्र तरीही राऊत यांनी थेट दिल्ली दरबारी पत्र लिहून तक्रार केल्यामुळे काँग्रेस श्रेष्ठींनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच प्रदेशाध्यक्षांना विश्वासात न घेता थेट श्रेष्ठींकडे तक्रार करणे, ही कृती योग्य नसल्याचे मत काँग्रेस श्रेष्ठींचे असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, राज्यातील मविआच्या नेत्यांसह (MVA Leader) राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस भेट घेतली होती. यावेळी निवडणूक आयोगाला भेटायला जाणाऱ्या शिष्टमंडळात हर्षवर्धन सपकाळ यांचेही नाव होते, मात्र ते अनुपस्थित राहिल्याने चर्चा सुरू झाल्या होत्या. यानंतर सपकाळ यांनी मनसेला सोबत घेण्यासंदर्भात हे शिष्टमंडळ नव्हते तर हे शिष्टमंडळ निवडणुकांमधील घोटाळ्यासंदर्भात भेटले होते. यामध्ये आघाडी-युतीच्या चर्चा होण्याचा प्रश्न नाही. काँग्रेसचे (Congress) प्रतिनिधी म्हणून आमचे लोक त्यात सहभागी झाले मला दिल्लीला बोलवण्यात आले म्हणून मी तिकडे गेलो होतो, असे म्हटले होते.
हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसचा पाठिंबा
संजय राऊत यांच्या पत्रावर नाराजी व्यक्त करतानाच, काँग्रेस श्रेष्ठींनी त्यांचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. सपकाळ यांनी घेतलेली भूमिका ही पक्षाच्या धोरणांशी आणि भविष्यातील राजकीय गणितांशी सुसंगत असल्याचे श्रेष्ठींचे मत आहे. या सर्व घडामोडींमुळे ‘महाविकास आघाडी’तील दोन प्रमुख पक्षांमध्ये मोठे मतभेद उघड झाले असून, मनसेच्या समावेशाचा मुद्दा आघाडीसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.




