मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात शरद पवारांची राष्ट्रवादी (Sharad Pawar NCP) आणि अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दोन्ही गटांच्या आमदार आणि खासदारांसह कार्यकर्त्यांची तशी इच्छा देखील आहे. परंतु, दोन्ही गटांच्या प्रमुखांकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
अशातच आता यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी माध्यमांशी बोलतांना भाष्य केले आहे. शरद पवार यांना माध्यम प्रतिनिधींनी दोन्ही राष्ट्रवादी (NCP) पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतांना शरद पवार म्हणाले की,” मला माहिती नाही”, असे म्हटले. त्यामुळे शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून सावध भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये “पक्षातील एका गटाला वाटतंय की आम्ही (अजित पवार) एकत्र यावं, तर दुसऱ्या गटाला स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवावं असं वाटत आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यायचं की नाही, पुढे कसं जायचं? हा प्रश्न दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा नाही. कधी ना कधी विचारसरणी एकच होती. त्याचाच हा प्रश्न आहे. त्यामुळे याबद्दल सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी ठरवावे” असे शरद पवारांनी म्हटले होते.
संजय राऊतांचे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर म्हणणे काय?
शरद पवार हे शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेने चालतात. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा शरद पवार राज्यात आणि देशात चालवत आहेत. धर्मांध आणि ज्या जातीय शक्ती या राज्यात वाढलेले आहेत, त्यांच्यासोबत शरद पवार यांच्यासारखा नेता, जो आमचा आदर्श नेता आहे, तो जाईल, असे त्यांच्या सहकाऱ्यांना आणि आमच्यासारख्या चाहत्यांना वाटत नाही, असे संजय राऊतांनी (Sanjay Raut) म्हटले होते.