मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Rain) दडी मारली आहे. खरीप हंगामाची (Kharif Season) तयारी केलेली असतानाच अचानक पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) टेन्शन वाढले आहे. मात्र, आता (दि.१३) जूनपासून पुन्हा एकदा राज्यात मान्सूनचे जोरदार कमबॅक होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अलर्ट जारी करण्यात आला असून, राज्यातील एकूण १३ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या (Meteorological Department) अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे असून, मुसळधार पाऊस बरसण्याचे भाकीत आहे. तर आज (दि ११ जून) रोजी सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे आय एमडीने या भागात आणि राज्याच्या उर्वरीत जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. या पावसामुळे राज्यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते.
तसेच शेतीपिकांनाही मोठा फटका बसला होता. त्यानंतर आता जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने उघडीप दिली आहे. साधारणपणे राज्यात १५ जूनपासून मान्सूनच्या (Monsoon) पावसाला सुरुवात होते. मात्र, यावेळी मान्सून लवकर दाखल झाला होता. त्यामुळे पाऊस लवकर सुरू होईल अशी अपेक्षा होती. मे महिन्यात पाऊस सुरू झाला होता. परंतु, जून महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे. यानंतर आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट
यलो अलर्ट – पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, मुंबई आणि ठाणे
ऑरेंज अलर्ट – पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग




