मुंबई । Mumbai
महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर आता विधानसभेचे विशेष अधिवेशन होणार आहे. त्यापूर्वी भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची राज्याच्या विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनासाठी आज राजभवनामध्ये कालिदास कोळंबकर यांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ दिली. यामुळे आता राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्गज नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या शपथविधीत काही मंत्र्यांनाही शपथ दिली जाईल अशी चर्चा होती परंतु शेवटपर्यंत खातेवाटप आणि इतर चर्चांमुळे केवळ तिघांचाच शपथविधी सोहळा पार पडला.
आता उर्वरित मंत्रिमंडळ सदस्याचा शपथविधी कधी होणार ही चिंता इच्छुकांना लागली आहे. परंतु नागपूर हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार करून शपथविधी सोहळा पार पाडला जाऊ शकतो. दरम्यान ज्येष्ठता, गुणवत्ता, पक्षातील महत्त्व, प्रादेशिक समतोल, सामाजिक समतोल, संख्याबळ, जनतेचा पाठिंबा असे अनेक निकष लावून मंत्रिपदासाठी नाव निश्चित केले जाते. तसेच राजकीयदृष्ट्या कोण, किती उपयोगाचे हेही पाहिले जाते. निवडणुकीचा निकाल लागल्यापासूनच मंत्रिपदासाठीचे सगळे इच्छुक आमदार मुंबईत आपापल्या पक्षाच्या नेत्यांकडे फिल्डिंग लावून तयार आहेत.