अहिल्यानगर (प्रतिनिधी)
राज्यभर पडलेल्या पावसामुळे कमाल तापमानात लक्षणीय घट झाली आहे. सध्या कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये पावसाचे ढग सक्रिय आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसांत वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यासाठी पुढील चार दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यांच्या अंदाजानुसार, राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम अजून वाढणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट ?
- १० मे-रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, अहमदनगर (अहिल्यानगर), संभाजीनगर, जळगाव, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
११ मे-राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा यलो अलर्ट जारी
१२ मे-संपूर्ण विदर्भात यलो अलर्ट, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भंडारदरात जोरदार पाऊस
भंडारदरा (वार्ताहर) -भंडारदरा धरण आणि परिसरात काल रात्री ७.३० वाजेपासून जोरदार पाऊस कोसळत होता. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. काल दुपारपासूनच या परिसरात ढगांची गर्दी होऊ लागली होती. रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाट, ढगांच्या गडगडाटात पावसास सुरूवात झाली. सुरूवातीला रिपरिप सुरू होती. त्यानंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसास सुरूवात झाली. त्यानंतर रात्री ९.३० वाजताही रिपरिप सुरू होती. पाणलोटातील काही भागातही पाऊस कोसळत होता.