अहिल्यानगर (प्रतिनिधी)
राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्य सरकारने शुक्रवार (दि. ६) फेब्रुवारी रोजी शासन निर्णय काढला आहे. त्यानुसार आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने हे परिपत्रक काढले आहे. यामुळे एकट्या नगर जिल्ह्यातील १ लाख २५ हजार महिलांना यापूर्वी ई-केवायसीची माहिती भरताना झालेली चूक सुधारता येणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी पोर्टल शुक्रवारपासून सुरु करण्यात आले आहे. मागच्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते. राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल सुरू केले आहे. यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून आता ३१ मार्चपर्यंत केवायसी करता येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई-केवायसी पूर्ण केले आहे, परंतु ही प्रक्रिया पूर्ण करताना नजरचुकीने चुकीचा पर्याय निवडला, अशा महिलांना आता ३१ मार्च २०२६ पर्यंत ई-केवायसी करता येणार आहे. योजनेच्या पोर्टलवर तशी सुधारणा करण्यात आलेली असून यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी दिली जाणार नाही, असं शासनाने म्हटले आहे.
३१ डिसेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याचा निवडताना -लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य हे नियमित किंवा कायम कर्मचारी अथवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात असतील; किंवा सरकारी उपक्रम, मंडळ, भारत सरकार अथवा राज्य सरकराच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असतील तर त्याला लाभ मिळत नाही. नेमका असाच पर्याय काही लाभार्थी महिलांनी नजरचुकीने निवडल्याने त्यांचा लाभ बंद झाला होता. त्यामुळे सरकारने पुन्हा या महिलांसाठी साधारण दोन महिन्यांचा अवधी उपलब्ध करुन दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे अवर सचिव प्र. वि. कुलकर्णी यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे परिपत्रक काढण्यात आले असून पोर्टलमध्ये बदल केल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे महिलांनी तातडीने ईकेवायसी करुन घ्यावी, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय.
महिला बालकल्याण विभागाची अडचण होणार दूर
ई-केवासी करताना चुकीचा पर्याय निवडल्याने बंद झालेल्या लाडक्या बहिण योजनेतील मदतीचा हप्ता पुन्हा सुरू व्हावा, यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी महिला बालकल्याण विभागाकडे चकरा सुरू केल्या होत्या. मात्र, याबाबत शासनाकडून धोरणात्मक आदेश नसल्याने अधिकाऱ्यांना देखील संबंधीत महिलांना काय सांगावे, त्यांना मदत कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आता ३१ मार्चपर्यंत ई-केवायसीमध्ये चुकीची माहिती भरलेल्या महिलेल्या महिलांना त्यांची माहिती पुन्हा ऐडीट करून नव्याने भरता येणार आहे.





