शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
मराठा आरक्षणासाठी ही आरपारची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईहून परतणार नाही. ज्यांना शक्य आहे त्यांनी आमच्यासोबत मुंबईला निघावे, जे मागे राहतील त्यांनी मागची धुरा सांभाळावी. आरक्षण मिळाले नाही तर पुढे काय करायचे हे तुम्हाला ठाऊक आहे. लेकराबाळांच्या भविष्यासाठी अशीच एकजुट दाखवा. शेवगावकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आपण अर्धी लढाई जिंकली आहे, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना उद्देशून हाक दिली.
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अंतरवली सराटी येथून मुंबईकडे प्रस्थान करणारे जरांगे पाटील यांच्या आरक्षण संघर्ष यात्रेचे बुधवारी (27 ऑगस्ट) रात्री साडेआठच्या सुमारास शेवगाव शहरात भव्य स्वागत करण्यात आले.
शहरातील क्रांती चौकात मराठा बांधव व विविध संघटनांच्या वतीने जरांगे पाटील यांचे डीजेच्या तालावर, जेसीबीतून फुलांची उधळण करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. या ताफ्यात सायकल, मोटारसायकल, रिक्षा, ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, कार, खासगी बस अशा विविध वाहनांचा समावेश होता. दिवसभर मुसळधार पावसातही नागरिक आणि सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांची वाट पाहत उभे होते. घोटण येथे क्रेनच्या सहाय्याने 30 ते 40 फूट उंचीवरील भव्य हार घालण्यात आला. नित्यसेवा चौकात तब्बल 21 जेसीबींमधून फुलांचा वर्षाव करण्यात आला, तर क्रांती चौकात फटाक्यांच्या आतषबाजीने वातावरण दुमदुमले.
दरम्यान, सकाळपासूनच कर्हेटाकळी जिल्हा हद्द, रावतळे फाटा, खानापूर, अंतरवली, घोटण, तळणी, नित्यसेवा चौक, आंबेडकर चौक, वडूले बुद्रुक, सामनगाव, मळेगाव, आखतवाडे, आपेगाव, ढोरजळगाव- ने, निंबेनांदुर अशा गावागावांत फ्लेक्स, भगवे झेंडे आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या जयघोषात ताफ्याचे जोरदार स्वागत झाले. मराठा बांधवांसह मुस्लीम समाजानेही जरांगे यांचा सत्कार करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. मार्गात चहा, पाणी व नाश्त्याची उत्तम सोय करण्यात आली होती.
या स्वागत सोहळ्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, तहसीलदार आकाश दहाडदे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक विशाल लहाने आदी अधिकार्यांसह पोलीस दल तैनात होते. हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने जरांगे यांच्यासोबत मुंबईकडे रवाना झाले.





