Tuesday, January 6, 2026
HomeनगरAhilyanagar : मराठा समाजाची लग्नासाठी 20 कलमी आचारसंहिता

Ahilyanagar : मराठा समाजाची लग्नासाठी 20 कलमी आचारसंहिता

भास्करगिरी महाराजांच्या साक्षीने विवाह आचारसंहिता पालनाचा निर्णय

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सध्याचे लग्न पद्धती ही आपली जुनी संस्कृती मोडीत काढत आहे. मराठा समाज संस्कृतीला जपणे हे प्रत्येक समाज घटकाचे काम आहे. त्या पद्धतीने लग्न सोहळा करणे, तसेच स्वत:ची व समाजाविषयी निष्ठा बाळगणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र देवगड संस्थांचे संचालक व राष्ट्रीय संत भास्करगिरी महाराज यांनी केले. यावेळी अहिल्यानगरमधील प्रमुख मराठा बांधव व विविध क्षेत्रातील प्रमुखांच्या उपस्थितीत 20 कलमी आचारसंहितेची शपथ घेतली.

- Advertisement -

नगरमध्ये रविवारी मराठा सामाज लग्न सभारंभ आचारसंहिता संमेलन पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भास्करगिरी महाराज बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी श्रीक्षेत्र डोंगरगण येथील जंगले महाराज शास्त्री होते. संमेलनास पद्मश्री पोपटराव पवार, आ. संग्राम जगताप, माजी आ. साहेबराव दरेकर आदी मान्यवर प्रमुखातिथी म्हणून उपस्थित होते. पुण्यातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येनंतर व समाजातील महिलांवर होणार्‍या अन्याया यासंदर्भात नगर शहरातील मराठा समाजातील मान्यवरांनी राज्यात सर्व प्रथम एकत्र येऊन मराठा समाज आचारसंहिता ही तयार केली होती.
या आचारसंहितेनूसार पहिले संमेलन रविवारी घेण्यात आले. त्यावेळी प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत मराठा समाजातील प्रत्येक घटकातील 11 सदस्यांना 20 कलमी आचारसंहितेची शपथ देण्यात.

YouTube video player

यामध्ये उद्योजक, समाजसेवक, वकील, डॉक्टर, महिला शिक्षक, पत्रकार तसेच मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ, मराठा उद्योजक लॉबी, छावा संघटना आदींसह अनेक घटकातील प्रतिनिधींचा समावेश होता.
यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले, आपण स्वतः सुधारण्याचा प्रयत्न करा. एका दिवसात बदल घडणार नाही, पण एक दिवस असा येईल की त्या दिवशी संपूर्ण विवाह पद्धती ही बदलती जाणार आहे. आजच्या अनेक विवाहामध्ये जुन्या रूढी परंपरा नष्ट होत आहेत. जात, धर्म, पंथ यापेक्षा आपण मोठे लग्न कसे करू असे, असा अट्टासह करणारे अनेक समाजात आहेत. ही प्रवृत्ती मोडीत काढली पाहिजे. मराठा समाजातील मान्यवरांनी जी आचारसंहिता आपल्यासमोर ठेवली आहे, तिचे पालन केले तर इतर समाजही त्याचा आदर्श घेतील. त्यामुळे उचललेले हे पाऊल अतिशय कौतुकास्पद आहे.

यावेळी पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले, प्रत्येक गावामध्ये या आचारसंहितेचे सामूहिक वाचन होणे गरजेचे आहे. या संहितेचे पालन फक्त मराठा समाजाने नाही, तर इतर समाजाने सुद्धा केले पाहिजे. आपलं गाव, आपला देश, आपला प्रदेश, आपले कुटुंब, आपली संस्कृती जपण्याचे काम हे यापुढील काळात सगळ्यांनी केले पाहिजे. आ. जगताप म्हणाले, मराठा म्हणजे महाराष्ट्र आणि मराठा समाजाने मोठा भाऊ या नात्याने पुढे उचलत त्याचा प्रचार आणि प्रसार करून इतर समाजालाबरोबर घेऊन त्यांना सुद्धा आचारसंहिता पाळण्यासाठी प्रयत्न केले तर अनेक कुटुंबांचे भले होऊ शकेल. माजी आ. दरेकर म्हणाले, माझ्या घरातील प्रत्येक लग्न अतिशय साध्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आजची ही चळवळ बीडसह संपूर्ण मराठवाड्यात राबवण्यामध्ये मी गेली अनेक वर्ष सातत्याने प्रयत्न केले आहेत. आज मराठा समाजाने एकत्र येऊन हे उचललेले पाऊल म्हणजे एक नवा आदर्श समाजापुढे घालून दिला आहे.

जंगले महाराज शास्त्री म्हणाले, संस्कृती ही महिलेच्या खांद्यावर असते. महिलेने जर संस्कृतीत आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना वाढवले तर समाजापुढे नवा आदर्श निर्माण होईल. समाजाने या गोष्टी स्वीकारणे ही काळाची गरज आहे. एकाच दिवशी हा बदल होणार नाही, पण बदलाचे वारे म्हणजे हे संमेलन आहे. समूहाने ठरवले तर काहीही करता येईल. संस्कृतीने समाजाला बांधून ठेवता येईल. आज संतवाणी याच विचाराने महाराष्ट्रात चालू आहे. समाज सुधारण्याचे काम आम्ही मंडळी करत असतांना समाजाला याबाबत जागृत करणे व ही आचारसंहिता पालन करण्यासाठी याचा प्रचार आणि प्रसार करणे ही आमची ही तेवढीच जबाबदारी आहे. पुढील काळात वारकरी संप्रदायातील लोक या चळवळीला अधिक व्यापक करतील असे ते म्हणाले.

प्रारंभी प्रास्ताविक करताना सुकाणू समितीचे प्रमुख समन्वयक उद्योजक एन. बी. धुमाळ म्हणाले, ज्यावेळी पुण्यातील घटना घडली आणि इतर काही घटना घडल्या त्यातून समाजामध्ये जागृती करण्यासाठी आम्ही आचारसंहिता तयार केली. त्याची अंमलबजावणी 31 मेपासून सुरू झाली. अनेक जिल्ह्याने ती स्वीकारली, तसेच इतर समाजाने पण ती स्वीकारली आहे. यावेळी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे यांनी या आचारसंहिते मागील भूमिका विषद केले.

सूत्रसंचालन प्रा. गणेश भगत यांनी केले, तर आभार मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर सुरेश इथापे यांनी मानले. याप्रसंगी सुकाणू समितीचे सदस्य सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गाडे, प्राचार्य खासराव शितोळे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. स्वाती जाधव, किशोर मरकड, दशरथ खोसे, अशोक कुटे, प्रा. अशोक घोरपडे, अ‍ॅड. सुभाष काकडे, सी. ए राजेंद्र काळे, अ‍ॅड सुभाष काकडे, अ‍ॅड. भीमराज काकड, अ‍ॅड. सुभाष भोर, अ‍ॅड. शिवाजी कराळे, डॉ. अविनाश मोरे, मराठा क्रांती मोर्चाचे गोरख दळवी, जिजाऊ ब्रिगेडच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष नंदिनी सोनाळे, माजी महापौर शीलाताई शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य सदस्या संपूर्णा सावंत, मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब काळे, लेखक संजय कळमकर, ज्ञानदेव पांडुळे, शब्दगंध साहित्य चळवळीचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, उद्योजक हरिभाऊ डोके, शेतकरी संघटनेच्या बापूसाहेब भोसले, नगरसेवक बाळासाहेब पवार, महिला समितीच्या सदस्या अनुराधा येवले, दिलीपराव मिस्कीन, शशिकांत भामरे, सेवानिवृत्त अधिकारी सुरेश म्हस्के, उदय अनभूले, मराठा सोयरीक संस्थेच्या जयश्री कुटे, आदींसह मराठा समाजातील विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर उपस्थित होते.

मराठा विवाह सोहळा संहितेतील प्रमुख मुद्दे

  • लग्न सोहळा 300 ते 500 लोकांत करावा
  • प्री-वेडिंग बंद करावे
  • साखरपुडा हळद व लग्न एकाच दिवशी करण्यात यावे
  • लग्नात हुंडा घेऊ नये व देऊ नये
  • डीजे लावण्याऐवजी पारंपरिक वाद्य व लोक कलावंतांना संधी द्यावी
  • कर्ज काढून लग्न करू नयेत
  • नवरदेवापुढे दारू पिऊन नाचणार्‍या तरुण-तरुणींना पायबंद घालावा
  • लग्न सोहळ्यात फक्त वधू आणि वर पित्यानेच फेटे बांधावेत
  • लग्नात सोन्यांच्या वस्तू, गाड्यांच्या चाव्या देऊन देखावा करू नये
  • रोख स्वरूपात बाहेर देण्याऐवजी पुस्तक द्यावेत
  • अन्नाची नासाडी थांबवावी
  • भांडी-फर्निचर न देता मुलीच्या नावाने एफडी करावी
  • सामूहिक विवाह ही काळाची गरज समजून त्यासाठी प्रयत्न करावेत
  • लग्नानंतर मुलीच्या संसारात मुलीच्या आईकडून मोबाईलवर होणार हस्तक्षेप बंद करावा
  • सासरच्या लोकांनी पैशासाठी सुनेचा छळ करू नये
  • नवउद्योजक व्यवसायिकांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्घाटन कार्यक्रमात हे ऐपतीप्रमाणे रोख रक्कम किंवा त्याच्याकडून खरेदी करावी
  • लग्न व दशक्रियाविधी प्रसंगी आशीर्वाद आणि श्रद्धांजली नकोत
  • उद्योग आणि आर्थिक साक्षरता समाजप्रबोधन करावे

ताज्या बातम्या