मुंबई । Mumbai
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपी वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं निरीक्षण विशेष मकोका (MCOCA) न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं आहे. वाल्मीक कराडने आपण निर्दोष असल्याचा दावा करत बीड जिल्हा न्यायालयात दोषमुक्तीचा अर्ज सादर केला होता. मात्र, या अर्जावर निर्णय देताना न्यायालयाने आरोपीविरुद्ध गंभीर निरीक्षणं नोंदवत त्याचा अर्ज फेटाळून लावला.
न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केलं की, वाल्मीक कराड हा गुन्हेगारी टोळीचा सक्रिय सदस्य आहे. गेल्या दहा वर्षांत त्याच्यावर सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. याशिवाय, बीड जिल्हा न्यायालयात त्याच्याविरुद्ध ११ फौजदारी खटले अद्याप प्रलंबित आहेत. कराड आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध एकूण २० पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असून, त्यामध्ये खंडणी, धमक्या, जीवाला धोका आणि जबरदस्ती यांचा समावेश आहे.
सरपंच संतोष देशमुख यांचा खून एका नियोजित कटाचा भाग होता, असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. देशमुख हे गुन्हेगारी टोळीच्या खंडणीच्या मार्गात अडथळा ठरत असल्यामुळे त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या संपूर्ण कटात कराड याची भूमिका केंद्रस्थानी असल्याचे पुराव्यांच्या आधारे सिद्ध झाले आहे. वाल्मीक कराडने दोषमुक्तीचा अर्ज सादर केला असला, तरी न्यायालयाने त्याच्या विरोधातील साक्षी, गोपनीय जबाब, डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक तपासणीचे निष्कर्ष आणि महत्त्वाचे साक्षीदार यांचा विचार केला. यावरून त्याच्याविरुद्ध सबळ पुरावे असल्याचं न्यायालयाने नमूद केलं. त्यामुळे त्याचा दोषमुक्ती अर्ज फेटाळण्यात आला.
याशिवाय, अवादा एनर्जी प्रकल्पास दिलेल्या धमक्या, फोनवरून दिलेले इशारे, तसेच जीवे मारण्याच्या धमक्यांमुळे त्याच्या विरोधातील आरोप गंभीर स्वरूपाचे ठरतात. याच कारणांमुळे न्यायालयाने त्याच्या जामिनालाही नकार दिला आहे. विशेष मकोका न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, समाजात भीती निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कायदा कठोरपणे वागेल. संतोष देशमुख यांचा खून हा गुन्हेगारी कटाचा भाग असून, त्यामागील मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मीक कराडची भूमिका निर्विवाद असल्याचं ठाम मत न्यायालयाने नोंदवलं आहे.




