मुंबई | Mumbai
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण औरंगजेबच्या कबरीच्या मुद्द्यावरून चांगलेच ढवळून निघाले आहे. औरंगजेबची कबर हटवण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची तुलना औरंगजेबशी केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे. या विधानावरून भाजपचे आमदार आज विधिमंडळात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
मुख्यमंत्र्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी या आमदारांकडून करण्यात आली. त्यावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारच्या वतीने भूमिका मांडत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करत राहुल गांधी यांना खुश करण्यासाठी सपकाळ यांनी हे अविवेकी आणि बेताल विधान करून महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचा अपमान केला असे म्हटले आहे.
यावेळी बोलतांना बावनकुळे म्हणाले की, “काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले विधान अत्यंत बालिश, बेजबाबदार आणि महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. औरंगजेब हा क्रूर, अत्याचारी, धर्मांध शासक होता, ज्याने हिंदू धर्म आणि हिंदुस्थानच्या अस्मितेवर आघात केले. त्याची तुलना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या लोकशाहीवादी, सक्षम आणि विकासाभिमुख नेत्याशी करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा बालिश प्रयत्न आहे”, असे त्यांनी म्हटले.
हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले होते?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते की, “औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उचलून टाका, असं सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे”, असे त्यांनी म्हटले होते.