नाशिक | प्रतिनिधी Nashik
एसटी कर्मचार्यांच्या प्रश्नांसाठी आपण कुणालाही अंगावर घेण्यासाठी तयार आहोत. या लढ्यात आपण सेवा, शक्ती, संंघर्ष एसटी कर्मचारी संंघाच्या सोबत असून कर्मचार्यांच्या प्रश्नांसाठी संघटनेचे पदाधिकारी, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन एसटी कर्मचार्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिले.
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्यच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात राज्यस्तरीय कामगार मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, भाजप शहराध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी, यतीन कदम, गिरीश पालवे, सुधाकर बडगुजर यांच्यासह सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कर्मचारी संघाचे पदाधिकारी व एसटी कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
मंत्री भुजबळ पुढे म्हणाले की, आ. पडळकर, खोत यांच्या नेतृत्वाखालील संघटना जिथे जिथे अन्याय होतो, त्याठिकाणी नेहमीच पुढे राहून काम करत आहे. सर्वसामान्य कामगारांचे प्रश्न आपले प्रश्न म्हणून हे लढत आहेत. एसटी कर्मचारी कामाच्या अत्यंत अवघड परिस्थितीतही, खडतर हवामानात, अपुर्या सोयींमध्ये ही सेवा अखंड सुरू ठेवण्याचे काम करत आहे. या सर्वांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे.
यावेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, एसटी कर्मचारी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जनतेची सेवा करत आहे. एसटी ही ग्रामीण भागाचा आत्मा आहे. चांगल्या बसेस उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. तसेच कर्मचार्यांच्या आरोग्य सेवेच्या दृष्टीने देखील नियोजन करण्याची आवश्यकता आहे. कर्मचार्यांना योग्य ते वेतन मिळालेच पाहिजे. यासाठी आपण विधिमंडळात आणि मुख्यमंत्री यांंच्याशी देखील बोलून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. आ. पडळकर व खोत यांंनी गेल्या तीन वर्षांच्या संंघटनेच्या कार्याचा आढावा घेेऊन यापुढेही संघटन मजबूत ठेवण्याचे आवाहन केले.




