मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
राज्यातील अनेक भागांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारसह विविध संघटना यांच्याकडून शेतकऱ्यांना (Farmer) मदत करण्यात येत आहे. यासाठी आता राज्य सरकारमधील मंत्री देखील पुढे सरसावले आहेत.
राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपले वर्षभराचे ३१ लाख १८ हजार २८६ रुपयांचे वेतन आज (मंगळवारी) मुख्यमंत्री सहायता निधीत (Chief Minister Relief Fund) जमा केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
महाजन यांनी त्याबाबतचे धनादेश आणि संमतीपत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी सादर केले. आपले वर्षभराचे वेतन पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला देणारे महाजन हे पहिले मंत्री ठरले आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील (Cabinet) आदी सदस्य उपस्थित होते.





