मुबंई | Mumbai
वरळीतील एनएसआय डोममध्ये आज ठाकरे बंधूच्या (Thackeray Brother) पुढाकारातून राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मराठीच्या मुद्द्यावरुन भाषण करत उपस्थितांना संबोधित केले. यावेळी दोन्ही बंधूंनी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना टोले देखील लगावले. तसेच उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार प्रहार केला. यानंतर आता मंत्री नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर देतांना अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आहे.
मंत्री नितेश राणे (Minister Nitesh Rane) म्हणाले की, “आज मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले ते चांगलं झालं हा त्यांच्या कुटुंबाचा विषय आहे. पण अंतरपाट दूर झाला असं उद्धव ठाकरे बोलले. त्यामुळे आता यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना आणि मनसेवाल्यांनी सांगावं. ठाकरेंच्या व्यासपीठावर कॉम्रेड आणि समाजवादी विचारांचे लोक होते हे बाळासाहेबांना आवडलं असत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच आता हे फक्त सीमीच्या दहशतवाद्यांशी युती करायचे राहिले आहेत, असेही त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “नऊ महिन्याआधीच महायुतीला (Mahayuti) लोकांनी निवडून दिलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आम्हीच निवडून येऊ. मुंबईतील हिंदू समाज आता यांना परत घरात बसवणार आहे. असेही नितेश राणे म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी कोणत्या शाळेत शिकले असा प्रश्न केला होता. त्यावर बोलतांना राणे म्हणाले की, “मोदी ज्या शाळेत शिकले त्या शाळेत शिकण्याची यांची लायकी नाही”, असे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
तसेच “एकट्या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) काय काय केलं हे महाराष्ट्राने (Maharashtra) पाहिलं. दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर हिंदू विरोधी देशद्रोह्यांना सर्वात मोठा आनंद झाला असेल.उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना काय काय त्रास दिला होता आणि आज त्यांच्यासमोर उद्धव ठाकरेंना नाक घासावं लागलं. आता मुस्लिम लीगसोबत युती करा तेच शिल्लक आहे”, असेही नितेश राणेंनी म्हटले.





