Tuesday, September 17, 2024
Homeनगरपवार-ठाकरेंचे वक्तव्य दंगली घडविण्यासाठीच- ना. विखे

पवार-ठाकरेंचे वक्तव्य दंगली घडविण्यासाठीच- ना. विखे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात उध्दव ठाकरे यांनी केलेले वक्तव्य वैफल्यग्रस्त अवस्थेतील असून, मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तिला शोभा देणारे नाही. शरद पवार यांच्या पाठोपाठ उध्दव ठाकरेचे वक्तव्य दंगली घडविण्यासाठी असल्याचा थेट आरोप महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. नामांतराच्या संदर्भात झालेली चूक जशी पवारांनी मान्य केली तशीच चूक मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मान्य करावी ,अशी मागणीही मंत्री विखे पाटील यांनी केली.

नगरमध्ये माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीला असे वक्तव्य शोभा देत नाही. परंतु सत्तेसाठी विचार गमावलेल्यांच्या तोंडी अशीच वक्तव्ये येणार त्यांच्याकडून दुसरी कोणती अपेक्षा नाही. राजकारणात मतभेद असू शकतात पण भावनेच्या भरात आपण काय बोलतो याचे भानही उध्दव ठाकरे यांना राहू नये याचे आश्चर्य वाटते. राज्यात मणिपूरचा संदर्भ देऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेले वक्तव्य आणि आता उध्दव ठाकरे यांची भाषा राज्यात दंगली घडविण्यासाठी आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील सर्व जनता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, आता राज्यात महायुतीला मिळत असलेला प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीला यश मिळणार नाही हे लक्षात आल्यानेच आशी वक्तव्ये पुढे येवू लागली असल्याचे विखे पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुध्दा आघाडीच्या तीनही पक्षाकडून भूमिका स्पष्ट केली जात नाही. काल उध्दव ठाकरे केंद्राकडे बोट दाखवून मोकळे झाले. पण तुम्ही मुख्यमंत्री असताना किंवा शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाच्या संदर्भात काय केले हे एकदा तरी सांगावे असे थेट आव्हान देऊन नामांतराच्या संदर्भात झालेली चूक जशी पवारांनी मान्य केली तशीच चूक मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मान्य करावी, अशी मागणी मंत्री विखे पाटील यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या