राहाता |प्रतिनिधी| Rahata
त्यांना काय टीका करायची ते करु द्या, असं वक्तव्य करणारे नेतृत्व आपल्याला पाहिजे का? याचा समाज बांधवांनी विचार केला पाहिजे. तुम्ही व्यक्तिद्वेषच करणार असाल तर माझ्याकडे याचे उत्तर नाही, अशा शब्दांत ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष्मण हाके यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला.
कोणतेही आंदोलन करताना मागण्यांची भूमिका मांडणे गरजेचे असते, असे सांगून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार ही आमची भूमिका आधीपासून स्पष्ट होती. मात्र काही नेत्यांकडून केवळ बागुलबुवा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गॅझेटमधील नोंदी 1967 पासून आहेत. दाखला मिळवण्यासाठी शासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे. मात्र काही व्यक्तींनी प्रसिद्धीसाठी वक्तव्य करताना भान ठेवले नाही. सामाजिक सलोखा बिघडविण्याचाच त्यांचा प्रयत्न दिसत असल्याचे ना. विखे पाटील म्हणाले.
आरक्षणाच्या बाबतीतल्या याचिका न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाबाहेर काही लोक मुक्ताफळे उधळीत असतील तर त्याला आपण काय उत्तर देणार, अशी टीका झाल्याबाबत वेदना होतातच. आमचे देखील अनेकांशी तात्विक मतभेद आहेत, मात्र अशा भाषा आम्ही कधी वापरल्या नाहीत. तुम्ही व्यक्तिद्वेषच करणार असाल तर माझ्याकडे याचे उत्तर नाही, अशा शब्दात त्यांनी लक्ष्मण हाके यांचे नाव न घेता समाचार घेतला.
मराठवाड्यात उध्दव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चावर टीका करताना ना. विखे पाटील म्हणाले, त्यांच्याकडे आता हंबरडा फोडण्याशिवाय काही राहिलेले नाही. शासनाने 32 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. शेतकर्यांना नियम बदलून मर्यादा वाढवून दिली आहे. आता फक्त निवडणुका जवळ आल्यामुळेच त्यांचे हंबरडा फोडण्याचे काम सुरू झाले आहे. सरकारला काम करु द्यावे, असे आवाहन ना. विखे पाटील यांनी केले.
अहिल्यानगर जिल्ह्याच्या नामकरणावरून कोणी काही वक्तव्य करत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. येथे येऊन कोणी जातीय सलोखा बिघडविणार असेल तर आम्ही निश्चित कारवाई करू. जिल्ह्याचे नाव का बदलले हे विचारण्याचा अधिकार आता त्यांना नाही, अशी स्पष्ट भूमिका ना. विखे पाटील यांनी मांडली.




