अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील दोन वेगवेगळ्या परिसरातून दोन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना समोर आल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल केले असून तपास सुरू आहे. सावेडी उपनगरात राहणार्या 30 वर्षीय महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी (वय 15) ही 19 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घरातून बेपत्ता झाली. याआधी रात्री किरकोळ कौटुंबिक वाद झाला होता.
मुलीचा मोबाईल देखील बंद असून ती कोणालाही न सांगता निघून गेल्याने आणि अद्याप परत न आल्याने तिच्या अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित प्रकरणी अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी परिसरात राहणार्या 35 वर्षीय महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या मुलीला (वय 15) देखील 19 जुलैच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे.
याबाबत तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीनंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीच्या अपहरणाबाबत तपास सुरू असून, तिच्या शोधासाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे. दरम्यान, सतत घडणार्या अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना चिंताजनक असून पालकांनी मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.





