मुंबई | Mumbai
महाविकास आघाडी आणि मनसे (Mahavikas Aaghadi and MNS) नेत्यांची आज (गुरुवारी) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुंबईत (Mumbai) ०१ नोव्हेंबरला होणाऱ्या ‘सत्याचा मोर्चा’च्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार अनिल परब, राष्ट्रवादी (श.प) पक्षाकडून आमदार जितेंद्र आव्हाड, मनसेकडून नितीन सरदेसाई आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.
यावेळी परब म्हणाले, “शनिवार (दि.०१ नोव्हेंबरला) निवडणूक आयोगाचा बेजबाबदार कारभार, मतचोरी, मतांमधील घोळ, निवडणुकीतील (Election) गैरव्यवहार याबाबतचा सत्याचा मोर्चा निघणार आहे. लोकांना सत्य कळावे आणि असत्य जनतेसमोर जावे यासाठी विरोधी पक्षाने, महाविकास आघाडीचे सर्व पक्ष, मनसे आणि जे जे सर्व या गोष्टींच्या विरोधात आहेत, मतदार देखील मोर्चात सामील होतील. हा मोर्चा दुपारी ०१ वाजता फॅशन स्ट्रिटवरून सुरू होऊन मेट्रो सिनेमामार्ग मुंबई महापालिकेच्या प्रवेशद्वारावर थांबले”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, “मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दुपारी १ ते ४ या वेळेत मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते आणि मनसेप्रमुख राज ठाकरे, डाव्या पक्षाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहून मोर्चाला मार्गदर्शन करणार आहेत. आम्ही मतचोरीचा बारकाईने अभ्यास करतो. मतदार यादीतील घोळ दूर करा. आम्ही घेतलेल्या आक्षेपांवर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे.आमचा मोर्चा आमच्या आणि मतदारांच्या मागणीसाठी आहे” असेही अनिल परब यांनी म्हटले.




