Monday, July 1, 2024
Homeनगरसंभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे - आ. काळे

संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे – आ. काळे

तहसील कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

पावसाळा सुरू होण्यास अत्यल्प कालावधी बाकी असून अशा परिस्थितीत प्रत्येक विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अचानकपणे आपत्ती निर्माण होत असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे गावा-गावांचा सपर्क तुटणे, वादळ, अतिवृष्टीमुळे विजेचे खांब उखडले जाऊन वीजपुरवठ्याची समस्या निर्माण होऊन उद्भवणार्‍या अडचणी अशा एक ना अनेक आपत्ती निर्माण होतात. त्यामुळे अशा संभाव्य आपत्ती निवारणासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे, असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले. मान्सूनपूर्व तयारीबाबतचा आढावा घेण्यासाठी आ. काळे यांनी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी उपस्थित प्रशासकीय अधिकारी व कर्मचार्‍यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आ. काळे म्हणाले, चालू वर्षी हवामान खात्याने होणार्‍या पर्जन्यमानाचा दिलेला अंदाज पाहता आगामी पावसाळ्याच्यादृष्टीने प्रशासनाने सर्व प्रकारची पूर्वतयारी करून ठेवावी.

पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी आणि पुरामुळे संपर्क तुटणार्‍या गावांना पुरेशा प्रमाणात दैनंदिन वस्तूंचा पुरवठा, आवश्यक औषधे तसेच धान्यपुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन करावे. अर्धवट राहिलेल्या विकास कामांचा नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी आपल्या हद्दीतील रेंगाळत पडलेली कामे तातडीने पूर्ण करून घ्यावीत. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार फैलावू नयेत यासाठी जलस्रोतांची गुणवत्ता तपासण्याबरोबरच आवश्यक तिथे पर्यायी व्यवस्था करावी. पाऊस, वादळाच्या प्रसंगी पूर परिस्थितीत वीज पुरवठा खंडित होतो अशा वेळी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने प्रभावी नियोजन करावे. आपत्कालीन परिस्थितीसाठी सर्व विभागांनी समन्वय साधून आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी व मतदार संघातील नागरिकांना सन्मानाची वागणूक द्यावी. आपत्ती काळात त्वरित संपर्क करण्यासाठी विविध आवश्यक विभागांचे आणि संपर्क यंत्रणांचे संपर्क क्रमांक अद्ययावत ठेवावेत, हवामान खात्याकडून वेळोवेळी येणारे धोक्याचे इशारे प्राप्त होताच योग्य माहिती सर्वदूर जलदगतीने पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा. मतदार संघात ज्या ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गरज असेल अशा सर्व ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करा, अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या.

यावेळी तहसीलदार विकास गंबरे, नायब तहसीलदार सातपुते, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मुख्याधिकारी सुहास जगताप, ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शहर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. गुट्टे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी प्रतिभा खेमनर, गट शिक्षणाधिकारी शबाना शेख, आरोग्य अधिकारी गायत्री कांडेकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सहा. अभियंता मेटकरी, भूमी अभिलेख उपअधीक्षक संजय भास्कर, पशुधन अधिकारी डॉ. अनिल तांबे, गोदावरी डावा कालवा अधिकारी पी. जी. गुंजाळ, कृषी अधिकारी पंडितराव वाघिरे, रचना सहा. किरण जोशी, पाणीपुरवठा अधिकारी स्वप्नील जाधव आदी प्रशासकीय अधिकार्‍यांसह काळे कारखान्याचे व्हा.चेअरमन डॉ. मच्छिंद्र बर्डे, सर्व संचालक, जिल्हा परिषद पंचायत समितीचे माजी सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून नियंत्रण कक्षात पूर्ण कर्मचार्‍यांची नियुक्ती करावी. 24 तास नियंत्रण कक्ष सुरू राहील व नागरिकांना तातडीने मदत कशी पुरविता येईल याची काळजी घ्या. दुर्घटना टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून दुर्घटनामध्ये जीवितहानी टाळण्यासाठी दक्षता घ्या. आपत्तीच्या काळात झालेल्या नुकसानीचे संयुक्तरित्या पंचनामे करून नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करावा. नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याबाबत सतर्क रहा. संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवा. नेमून दिलेली जबाबदारी प्रत्येक विभागाने पार पाडून मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी नियमीत संपर्क ठेवावा. सर्व यंत्रणांनी आपत्तीच्या काळात आपल्या जबाबदारीचे गांभीर्याने पालन करून सर्व विभागाच्या अधिकार्यांनी समन्वयाने काम करावे.

  • आ. आशुतोष काळे
- Advertisment -

ताज्या बातम्या