शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
सत्ता येऊनही मंत्रीपद न मिळाल्याने व्यथीत झालेले शिवसेनेचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी शपथ विधी सोहळ्याला न जाता थेट साईदरबारी हजेरी लावणे पसंत केले. त्यांना सरकारमध्ये टाळण्यात आले असले तरी त्यांनी सरकारच्या हातून चांगले काम घडावे व आपल्या हातूनही कोकणात चांगली सेवा घडावी यासाठी साईबाबांना आज मोठ्या मनाने साकडे घातले. येत्या एक दोन वर्षात कोकणात एवढे काम करेल की दिल्लीही मला बोलावेल, असा दृढ विश्वासही केसरकरांनी साईदरबारी व्यक्त केला. मंत्रीपद का मिळाले नाही याचे आत्मचिंतन करू असेही ते म्हणाले.
दीपक केसरकर निस्सीम साईभक्त आहेत. दर महिन्याला त्यांची शिर्डी वारी असते. निवडणूक काळात तर त्यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून गेल्या आठवड्यापर्यंत किमान चार वेळा साईदरबारी हजेरी लावली. प्रत्येक सुख- दु:खात साईबाबांच्या चरणाशी येणार्या केसरकर यांनी आजही मंत्रीपदाने हुलकावणी देताच शपथविधीला न जाता तडक शिर्डी गाठली. त्यांनी आज, रविवारी सायंकाळी धुपारतीला हजेरी लावली. साईदर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, आपण एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी दोन वेळा गेलो, त्यावेळी अनेक आमदार मंत्री होण्यासाठी शिंदेना भेटत होते.
त्यावेळी मला त्यांना भेटणे योग्य वाटले नाही़ दुसर्यांदा गेलो तर शिंदेंना भेटण्यासाठी पाच तास थांबलो अशी चर्चा होती. मात्र त्यावेळी शिंदे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेल्याने त्यावेळी माझी भेट झाली नाही. मंत्रीपदासाठी आपणच आपल्या नेत्यावर दबाव टाकायचा हे माझ्या बुद्धीला पटत नव्हते त्यामुळे मी तेथून निघून गेलो, असे केसरकर यांनी स्पष्ट केले. मराठी भाषेचे नवीन धोरण, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, दोनशे कोटींचे मुंबईत मराठी भवन अशी अनेक कामे शालेय शिक्षण मंत्री असतांना केली. ती कामे नवीन शिक्षण मंत्र्यांनी पुढे चालू ठेवावीत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.