नाशिक | Nashik
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधानसभेच्या सभागृहात जंगली रमी खेळतानाचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला होता. त्यामुळे कोकाटे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यानंतर आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण रमी खेळत नव्हतो तर तो व्हिडीओ स्किप करत होतो” असे स्पष्टीकरण दिले. तसेच आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असल्याचा इशाराही माणिकराव कोकाटे यांनी दिला होता.
त्याबरोबरच “मी गेम स्कीप केल्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही, तो दाखवला गेला नाही. पूर्ण व्हिडीओ दाखवला असता तर माझ्यावरील आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, हे स्पष्ट झाले असते, असा दावाही माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी केला होता. त्यानंतर आता कोकाटे यांचे हे विधान खोटेअसल्याचे म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोन व्हिडीओ पोस्ट करत प्रतिआव्हान दिले आहे. तसेच कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
रोहित पवारांनी पोस्टमध्ये काय म्हटले आहे?
सभागृहाचं कामकाज संपलं होतं हे कृषिमंत्री महोदयांचं विधान धडधडीत खोटं आहे. उलट विकासाच्या मूळ प्रवाहापासून दूर असलेल्या आदिवासी बांधवांना दुधाळ जनावरं देण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरु होती, पण ‘ओसाड गावच्या पाटलांना’ या चर्चेत रस नसावा… आणि मला सांगा पत्त्याची कोणती जाहिरात skip करण्यासाठी ४२ सेकंद लागतात हो? विझताना दिव्याची ज्योत मोठी होते, तसंच काहीसं कोकाटे साहेबांचं झालंय.. आज राजीनामा देऊन शेतकऱ्यांवर ते उपकार करतील, असं वाटत होतं पण ‘गिरे तो भी टांग उपर’ अशी त्यांनी भूमिका घेत कोर्टात जाण्याची भाषा केली, हे दुर्दैव आहे. मंत्री महोदय स्वतःला वाचवण्यासाठी आज जेवढा खटाटोप करत आहेत त्यापेक्षा दिलेल्या पदाला न्याय देण्यासाठी केला असता तर ही वेळ आली नसती.
विधिमंडळाची अप्रतिष्ठा होऊ नये म्हणून आवाज असलेले हे व्हिडिओ शेअर करणं मी टाळत होतो, पण मंत्री महोदयांनी कोर्टात जाण्याची भाषा केल्याने नाईलाजाने मला सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय.. आता चौकशी करायचीच तर कृषीमंत्री पत्ते खेळत होते की नाही याचीही चौकशी करावी आणि ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी नैतिकता दाखवून कोकाटे साहेबांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. महत्त्वाचं म्हणजे सत्य हे झाकणार नसल्याने राजीनामा देण्यासाठी पुढील अधिवेशनाची कशाला वाट पाहता आणि शेतकऱ्यांना सहन करायला लावता?




